कोंढवा – पुणे शहरालगतच्या 34 गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर या परिसरात तातडीने पालिकेचे मुबलक पाणी मिळेल, अशी अपेक्षा नारिकांना होती. मात्र, पाणी पुरवठा करण्यास पालिका असमर्थता दर्शवित आहे. यावर उच्च न्यायालयाने फटकारत समाविष्ट गावांना पाणी देण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केल्याने आज करु, उद्या करु, तयारी सुरु आहे, आराखडा तयार आहे… अशी आश्वासने देण्यात पालिका प्रशासन वेळ घालवित आहे. परंतु, आता, कोरडी आश्वासने नकोत, पाणी द्या, अशी आग्रही मागणी या गावांतील नागरिकांकडून केली जात आहे. यासाठी या गावांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येत ही समस्या सोडविणार असल्याचेही सांगितले जात आहे.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या 34 गावांपैकी उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी, होळकरवाडी, उरुळी देवाची ही गावे महापालिकेत समाविष्ट होण्याअगोदर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुबलक पाणीपुरवठा केला जात होता. विहिरीतून पंपिंगद्वारे पाणी टाकीत टाकले जात होते. शुद्धीकरणानंतर बंदनलिकेतून नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. परंतु, पालिकेत समावेशानंतर या गावांतील नळांना पालिकेचे पाणी एकदाही सोडण्यात आलेले नाही. परंतु, पाणी पट्टी मात्र वर्षभराची घेतली जात आहे. पालिकेत समावेशानंतर या गावांतील दफ्तर ताब्यात घेण्यापासूनच सर्व कारभार पालिकेने हाती घेतला, परंतु आजही समाविष्ट गावांना ग्रामपंचायतीने करुन ठेवलेल्या यंत्रणेद्वारेच पाणी पुरवले जात आहे. फक्त चौकाचौकात एक हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवल्या असून, त्यामध्ये कधी तरी एखाद्या टॅंकरने पाणी टाकले जाते.
अन्य सुविधांना थोडा वेळ लागला तरी चालेल. पाणी पहिल्यांदा द्या आणि ते ही बंद नलिकेतून हवे. सर्व प्रकारचा महसूल गोळा केला जातो. मात्र, सुविधा काहीच नाहीत. किमान पिण्याचे पाणी तरी लवकर द्यावे. पालिका प्रशासनावर लोकांचा विश्वास राहायला हवा, यासाठी तरी ठोस कामे कामे व्हायला हवीत.
– संदीप बांदल, माजी सरपंच, वडाचीवाडी
पालिकेचे पाणी आठ-आठ दिवस मिळत नाही. उन्हाळ्यात टॅंकरची वाट पाहात बसावे लागत आहे. ग्रामपंचायत बरी पण, पालिका नको, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सध्या, आम्हाला वालीच कोणी उरला नाही. मनपा, आधिकारी शोधून सापडत नाहीत. त्वरित मुबलक पाणी द्या. अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार.
– लक्ष्मण बांदल, माजी सरपंच, वडाचीवाडी
समाविष्ट गावांत पालिकेने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते, टॅंकरचे पाणी भरताना अनेकदा वादविवाद व भांडणे होत असल्याने पालिका प्रशासनाने बंदनलिकेतून पाणीपुरवठा करावा.
-अशोक न्हावले, माजी उपसरपंच, हांडेवाडी
महापालिकेने गाव परिसराला सोयीसुविधा देताना एखादे काम लवकर नाही झाले तरी चालेल. पण, पहिल्यांदा बंद नलिकेतून गाव परिसराला पाणी द्यावे. गावच्या सीमेवरुन पालिकेचा जलवाहिन्यांचे जाळे पसरले असताना, समाविष्ट गावांत पाणीटंचाई आहे.
-संजय जाधव, माजी सरपंच, हांडेवाडी