सातारा – कोविडमुळे लोकांच्या उत्पन्नात झालेली घट, बेरोजगारी, वाढती महागाई या परिस्थितीत सभासद व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने सेवा सोसायटी व व्यक्तिगत कर्जांच्या व्याजदरांमध्ये दि. 1 मेपासून एक टक्का ते तीन टक्के कपात केल्याची घोषणा बॅंकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आणि संचालक उपस्थित होते. नितीन पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बॅंकेने सात लाखांहून अधिक कर्जदारांना वित्तपुरवठा केला आहे. विनम्र आणि तत्पर सेवा देणाऱ्या बॅंकेने जिल्ह्याची अर्थवाहिनी अशी ओळख निर्माण करून देशपातळीवर आपले नाव उंचावले आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे अर्थचक्र ठप्प झाले आहे. त्यामुळे व्यापाराला गती देण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून बॅंकेच्या संचालक मंडळाने व्याजदर कपातीचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
संपूर्ण जिल्ह्यातील सर्वसामान्य घटकांचे अर्थकारण सुधारावे आणि बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ शेतकरी, सभासदांना व्हावा म्हणून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बॅंकेच्या 319 शाखांमार्फत वित्त पुरवठा केला जातो. प्राथमिक विकास सेवा सोसायट्यांच्या 68 योजनांच्या माध्यमातून हा वित्त पुरवठा होतो. याशिवाय व्यक्तिगत कर्जाच्या 47 योजना आहेत. बिगरशेती कर्जाचेही पाच प्रकार आहेत.
या सर्व योजनांच्या मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जांच्या व्याजदरांमध्ये एक ते तीन टक्के व्याजदर कपात करण्यात आली असून या योजनेचा लाभ 1 मेपासून सभासदांना देण्यात येणार आहे. ही व्याजदर कपात पूर्वलक्षी प्रभावाने कोणत्याही कर्ज योजनेला लागू होणार नाही. या निर्णयामुळे बॅंकेच्या तिजोरीवर 17 ते 18 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे; परंतु जिल्हा बॅंकेची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम असल्याने हा बोजा सहन करण्याची ताकद बॅंकेमध्ये आहे.
अनिल देसाई म्हणाले, जिल्हा बॅंकेने राष्ट्रीयकृत बॅंकांइतके व्याजदर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 10.5 टक्के व्याजदराने विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून जिल्हा बॅंक पतपुरवठा करणार आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी व्याजदराने पतपुरवठा करणारी ही एकमेव जिल्हा मध्यवर्ती बॅंक आहे. या निर्णयाचे सभासद, शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, विकास सेवा संस्थांमार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकल्पांसाठी विविध योजनांमधून कर्ज पुरवठा केला जातो. सन 2021-22 मध्ये 12 हजार 355 सभासदांना 24,911.32 लाख रुपयांचे कर्ज वाटप बॅंकेने केले आहे. बॅंकेने राज्यात कर्ज वाटपाचा उच्चांक प्रस्थापित केला आहे. संचालक मंडळाने शेती व शेतीपूरक व्यवसायांसाठी सर्व योजनांच्या कर्जांच्या व्याजदरांमध्ये एक ते दोन टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. फळबाग, फुलशेती, उपसा जलसिंचन, ठिबक तुषार सिंचन सारख्या शेती उत्पादनात वाढ करून देणाऱ्या उत्पादक कर्ज योजनांसाठी सभासदांना 10.5 टक्के, तर शेतकरी निवास, सर्वसामान्य कर्ज योजनेसारख्या अनुत्पादक कर्जांसाठी 11 टक्के व्याजदर लागू आहे.
क्षारपड जमीन सुधारणा कर्ज योजनेसाठी सवलतीचा व्याजदर दहा टक्के निश्चित करण्यात आला आहे. शैक्षणिक कालावधीतील व्याज परतावा योजना गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. शैक्षणिक कर्जदारांना शिक्षण कालावधीत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. शैक्षणिक कालावधी समाप्तीनंतर शेतकरी सभासदांचा व्याजाचा भार कमी करण्यासाठी बॅंकेने या योजनेला दहा टक्के हा अत्यल्प व्याजदर लागू केला आहे.