मुंबई : राज्यात दि. १ जुलै ते दि. ३ जुलै पर्यंत ८५५ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे २ लाख ९५ हजार ६१६ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७, मे महिन्यात ३३ लाख ८४ हजार ०४०, जून महिन्यात ३० लाख ९६ हजार २३२, जुलैमध्ये आतापर्यंत २ लाख ९५ हजार ६१६ आणि असे एकूण दि. १ एप्रिल ते दि. ३ जुलै या कालावधीत ९२ लाख ७५ हजार १४५ शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अजूनही नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा म्हणजे पाच रुपये दर सप्टेंबर पर्यंत लागू राहणार आहे.