मुंबई – अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पवार यांच्यासह इतर ८ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपत घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे महत्वाच्या आणि बड्या नेत्यांचा समावेश आहे.मंत्री पदाची शपथ घेतलेली असली तरी खातेवाटप मात्र पार पडलेले नाही. अशात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना राज्य मंत्र्यांचे बंगले दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
शिंदे शिवसेना भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे तीन पक्ष सध्या सत्तेत असल्यामुळे आधीच्या कोणत्या आमदारांना कोणते मंत्रिपद तसेच सध्या शपथ घेतलेल्या कोणत्या मंत्र्यांना कोणतं खात मिळणार याचा तिढा कायम असताना आता राष्ट्रवादीच्या कॅबिनेट मंत्र्यांना राज्य मंत्र्यांचे बंगले दिले गेल्याने नव्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा स्वर असल्याचे पाहायला मिळते.
एकीकडे खातेवाटप नाही दुसरीकडे राज्य मंत्र्यांचे निवास कॅबिनेट मंत्र्यांना दिले मात्र कामकाजासाठी दालनाची सोय झालेली नाही. या सर्व प्रकारांमुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अशात शिंदे फडणविसांच्या मंत्र्यांनी कामाचा धडाका लावला आहे तर राष्ट्रवादीचे मंत्री अद्याप कामासाठी सेटल झालेले नाहीत.
कोणाला कोणता बंगला
संजय बनसोडे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. त्यावेळेसच्या सरकारमध्ये त्यांचे सुरुची इमारतीमध्ये निवासस्थान होते.शिंदे भाजप सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री आहेत. मात्र त्यांचे निवासस्थान यावेळेस देखील सुरुची इमारतीमध्येच देण्यात आले आहे.अनिल पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम यांच्याबाबत देखील हीच परिस्थिती आहे. या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपत घेतली आहे. मात्र त्यांना देखील सुरुची इमारतीमध्येच निवासस्थान देण्यात आले आहे. सुरुची या इमारतीमध्ये शक्यतो राज्यमंत्र्यांना निवासस्थान देण्यात येतात.
अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीमधील महत्वाचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिले जाते. मविआच्या काळात भुजबळ हे ‘रामटेक’ बंगल्यामध्ये वास्तव्याला होते. मात्र या सरकारमध्ये त्यांना मंत्रालया समोरचा सिद्धगड हे निवासस्थान देण्यात आले आहे. माविआच्या काळात हे निवासस्थान यशोमती ठाकूर यांच्याकडे होते.
धनंजय मुंडे यांना देखील या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. त्यांना मंत्रालया समोरील प्रचितगड हे निवासस्थान देण्यात आलं आहे. तर हसन मुश्रिफ यांना विशालगड हे निवासस्थान देण्यात आला आहे. हा बंगला देखील यापूर्वी राज्यमंत्र्यांकडे होता. माविआच्या काळात गृहमंत्री राहिलेले दिलीप वळसे पाटील हे शिवगिरी या प्रशस्त बंगल्यामध्ये निवासाला होते आता मात्र त्यांना मंत्रालयाच्या समोर सुवर्णगड हे निवासस्थान देण्यात आले आहे.