भोर – करोनाच्या लढ्यात शासकीय अधिकारी कर्मचारी प्रभावीपणे काम करीत आहेत. मात्र, काही जण संचारबंदीच्या नावाखाली गैरहजर राहत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी व करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात रहावे, असे आदेश वरिष्ठ कार्यालयातून जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे भोर, वेल्हे तालुक्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयातच राहावे, तर कामचुकारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा निर्वाणीचा इशारा भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना दिला आहे.
भोर-वेल्हे तालुक्यातील काही कर्मचारी पुणे, सातारा व अन्य जिल्ह्याच्या ठिकाणावरून कामावर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. तेव्हा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहणे बंधनकारक केले आहे. जे अधिकारी कर्मचारी मुख्यालयात राहणार नाहीत. अशांवर साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी काढलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे.
करोना संचारबंदी काळात भोर शहर व परिसरात रहदारीच्या चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामदूत व शहर दूतांच्या मार्फतच ठरवून दिलेल्या दिवशीच अत्यावश्यक सेवा व किराणा दुकानातील बाजारासाठी ग्रामदूत शहरात सोडले जातात. तर मोकाट फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई केली जात आहेत. त्यामुळे शहर व परिसरातील नागरिकांची गर्दी नियंत्रणाखाली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
“त्या’ तालाठ्यास बसणार चाप?
विनाकारण दुचाकीवरून येऊन पोलिसांना कोणती ही ओळख न दाखवता मला तहसील कार्यालयात जायचे आहे. असे सांगून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या व भोर सजा नसणाऱ्या एका तलाठ्याने पोलिसांना चांगलीच डोकेदुखी केली आहे; परंतु प्रांताधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहण्याचे आदेश सर्वच कर्मचाऱ्यांना काढल्याने आता या तलाठ्याच्या डोकेदुखीतून पोलिसांची सुटका होईल का? या चर्चेने भोरमध्ये उधाण आले आहे.