मंचरमध्ये “राष्ट्रवादी’तर्फे शेतकरी मेळावा
मंचर –मी प्रामाणिकपणे सांगतो की, मला इडी किंवा इन्कमटॅक्सची नोटीस नाही. डिंभे धरणातून बोगदा माणिकडोह धरणात नेऊन पाणी नगरला नेण्याची भूमिका पक्षातील काही नेत्यांची होती. मात्र, तालुक्याच्या भल्यासाठी या भूमिकेलाही मी नकार दिला. आताच्या सरकारने आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांत असलेले नदीवरील बंधारे यापुढील काळात पावसाच्या पाण्याने भरता येतील त्यानंतर नाही, असा निर्णय घेतला असून तो निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी सत्तेत येऊन हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेगळा निर्णय घेतल्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवार (दि. 9) सांगितले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. मंत्री झाल्यानंतर वळसे पाटील यांनी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट केली.
आमची लढाई शरद पवार यांच्याशी नाही, अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील 45 आमदार असून एवढे आमदार आमच्याबरोबर का आले, हा विचार पक्षश्रेष्ठींनी करावा. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बॅंकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, “भीमाशंकर’चे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील, केशरताई पवार, संजय गवारी, अंकित जाधव, गोविंदशेठ खिलारी, शिवाजीराव ढोबळे, बाबासाहेब खालकर, गणपतराव इंदोरे, रामशेठ गावडे, सचिन भोर,
अरविंद वळसे पाटील, सचिन पानसरे, दौलत लोखंडे, संतोष सैद, प्रदीप आमोंडकर, संदीप थोरात, अरुण बांगर, प्रशांत बागल, वैभव उंडे, लक्ष्मण बाणखेले, पोपटराव थिटे, शांताराम हिंगे, संदीप थोरात, सोमनाथ काळे, भाऊसाहेब टाव्हरे, दिलीप लोखंडे, शांताराम हिंगे, ऊर्मिला धुमाळ, बाळासाहेब वाळुंज उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश पडवळ यांनी तर अंकित जाधव यांनी आभार मानले.
पवार साहेबांना सांगूनच सर्व केले
वळसे पाटील म्हणाले, राष्ट्रवादीत व शरद पवार यांच्याबरोबर काम करताना मी अनेक पदे भूषवली. त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली. मात्र, आमदारांची कामे होत नव्हती. पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. हे सर्व आम्ही पवार साहेबांना सांगून केले आहे. आमची लढाई शरद पवार यांच्याशी नाही. त्यांची सभा आंबेगावात झाल्यास कार्यकर्त्यांनी सभेला उपस्थित राहावे.
निकम यांच्यावर नाव न घेता टीका
निवडणुकींना अजून दीड वर्ष असून मला आमदारकी किंवा मंत्रिपदाची लालसा नाही. मात्र तालुक्यातील काही जण माझ्या निष्ठेवर बोलत आहे. त्यांनी त्यांची निष्ठा तपासावी. त्यांना पक्षात विविध पदे दिली मात्र तेच आज विरोधात बोलत आहेत. त्यांनीही निवडणूक लागल्यास त्यांचे नशीब आजमावावे.