पुणे – मार्केटयार्डातील शेतमाल खरेदी विक्रीच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे शेतकऱ्यांसह खरेदीदार किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ठरवून दिलेल्या वेळेत शेतमाल खरेदी-विक्री होत असल्याने मार्केटयार्डातील डमी आडत्यांच्या शेतमाल दुबार विक्रीला चाप बसू लागला आहे.
नवनियुक्त संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. अपुरी जागा आणि वाढत्या शहरीकरणामुळे महात्मा फुले मंडईतून मार्केट यार्ड येथे सुमारे चाळीस वर्षांपूर्वी शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार सुरू झाले. आता मार्केटयार्ड येथील बाजाराची जागादेखील कमी पडत आहे. एकाच गाळ्यावर शेतमालाची दुबार विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक लूट, शेतकरी वाहनचालकांची लूट अशा व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आले आहे. अद्यापही काही प्रमाणात या गोष्टी सुरूच असल्या तरी संचालक मंडळाने शेतकरी हिताच्या निर्णय घेऊ लागल्याचे चित्र आहे.
फळे-भाजीपाला नियमनमुक्तीमुळे बाजार आवाराबाहेर आणि उपनगरांमध्ये परस्पर शेतीमालाची विक्री होत आहे. अनेक खरेदीदार उपबाजारांमध्ये खरेदीसाठी जात आहे. याचा परिणाम बाजार आवारातील व्यवहारांवर झाला आहे. बाजार आवारातील व्यवहार पहाटे तीन वाजता सुरू होतात. पहाटे येणारे खरेदीदार सकाळी लवकर महाग शेतमाल खरेदी करतात. तोच शेतमाल उशिरा आल्यास निम्म्या किमतीला मिळतो. याच शेतीमालावरून उपनगरांमध्ये किरकोळ विक्रेत्यांमध्ये स्पर्धा होते. यामध्ये पहाटे येणाऱ्या खरेदीदारांचे नुकसान होते. त्यातच आडत्यांच्या डमीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने संचालक मंडळाने बाजार आवारातील फळे- भाजीपाल्यांचा व्यवहार 11 वाजता बंद, तर कांदा बटाटा विभागाची वेळ दोनपर्यंत ठेवली आहे.
घाऊक बाजारात घाऊकच व्यापार व्हावा. घाऊक शेतमाल खरेदी-विक्रीचा वेळेच्या बंधनामुळे आडत्यांसह शेतकरी, खरेदीदार, किरकोळ व्यापारी, कामगार वर्गाला फायदा होत आहे. सर्वांना विचारात घेऊन शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात असून शेतकऱ्यांसह बाजार घटकांच्या सूचनांनुसार निर्णयांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत, असे पुणे बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर म्हणाले.
बाजारपेठेच्या वेळेबाबत नियोजन केल्यामुळे शेतमाल खरेदी-विक्रीला गती आली आहे. शेतमालास चांगले भाव मिळत आहेत. सकाळी लवकर व्यवहार उरकत असल्याने व्यापाराला वेळ मिळत आहे. मार्केटयार्डातील किरकोळ दुबार विक्री शंभर टक्के बंद झाल्यास शेतकऱ्यांचा आणखी फायदा होईल, असे महात्मा फुले मंडई शेतीमाल व्यापारी संघटनाचे अध्यक्ष राजेंद्र कासुर्डे यांनी सांगितले.
नवीन निर्णयामुळे सकाळी लवकर खरेदी-विक्रीचे व्यवहार उरकले जातील. तसेच खरेदीदारांना उपनगरांमध्ये विक्रीसाठी शेतीमाल लवकर घेऊन गेल्यास त्यांना चांगले भाव मिळत आहेत. त्यामुळे बाजार घटकात समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयाचा फायदा कामगार वर्गाला झाला आहे, असे कामगार असोसिएशनचे सचिव विशाल केकाण म्हणाले.