पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीच्या रस्ते दुरुस्तीची कामे २ मे पासून हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरात ३० एप्रिलपासूनच कोणत्याही प्रकारच्या रस्ते खोदाईस बंदी घालण्यात येत असून, त्यानंतर खोदाई केल्याचे आढळल्यास संबंधित विभागांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या पथ विभागाने दिला आहे.
त्यामुळे महापालिकेसह शहरात खासगी केबल कंपन्या, महावितरण, तसेच एमएनजीएलला आपली कामे पुढील महिन्याभरातच पूर्ण करावी लागणार आहेत, त्यानंतर महापालिकेकडून महिनाभर रस्ते दुरुस्ती केली जाणार असल्याचे पालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.
शहरात गेल्या काही वर्षांत महापालिकेची समान पाणी योजना, ड्रेनेज, महावितरण, खासगी मोबाईल कंपन्यांकडून वर्षभर रस्ते खोदाई केली जाते. त्यानंतर रस्ते दुरुस्ती केली जात असली, तरी मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून शहरात पावसाळ्यापूर्वीची रस्ते दुरुस्ती केली जाते. दरवर्षी २ मे पासून पावसाळा सुरू होईपर्यंत (७ जून) ही कामे केली जातात.
मात्र, काही विभाग काम सुरू करण्यास उशीर झाल्याचे सांगत महापालिकेने दिलेली मुदत संपल्यानंतरही रस्ते खोदाई करतात. परिणामी पावसाळ्यात खोदण्यात आलेला भाग दुरुस्त न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेकडून यंदा एक महिना आधीच सर्व संबंधित विभागांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, ३० एप्रिलपूर्वीच खोदाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रिसर्फेसिंगच्या कामांना सुरुवात
महापालिकेकडून २ मे पासून पावसाळापूर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू होणार असली, तरी आतापासूनच रस्त्यांची रिसर्फेसिंगची कामे सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी ४० ते ५० कोटींचा निधी या कामासाठी देण्यात येतो. त्यात पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे सर्वेक्षण करून पावसाळ्यात उखडू शकणारे रस्ते दुरुस्त केले जातात.