Nawab Malik : सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. 7 डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी हजेरी लावली. मात्र आमदार नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांना (Ajit Pawar)पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नसल्याचे म्हटले. फडणवीस यांच्या या पत्रानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली. या प्रकरणावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना मलिकांच्या भूमिकेबाबत लिहीलेल्या पत्रावरून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “तुम्ही अजित पवारांच्या कानात सांगू शकला असतात किंवा त्यांना व्यक्तीगत भेटून सांगू शकला असतात. पण, तुम्ही तसं न करता, पत्र लिहून ते सोशल मीडियावर व्हायरल केलं आणि देशभरात हे सांगितलं. कारण, नवाब मलिक यांचा धर्म… मलिक यांच्या धर्मामुळेच तुम्ही तसं केलं का? तुम्ही अनेकांना मंत्रिमंडळात घेतलं, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विशेष म्हणजे ज्यांना पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप करुन प्रमाणित केलं, त्यांनाही तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं. तुम्हाला केवळ धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करायचं आहे, हे अत्यंत लाजीरवाणं आहे, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
फडणविसांनी पत्रात काय म्हंटले?
‘नवाब मलिक हे विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार आहे. परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य नाही, असे आमचे मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचार घटक पक्षाला करावा लागत असतो. त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे,’ असे फडणवीसांनी अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांच्या पत्राबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र मला मिळालं असून मी ते पत्र वाचलं आहे. २ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. या सर्व घडामोडीनंतर नवाब मलिक हे पहिल्यांदा सभागृहात आले आणि ते कुठे बसले हे सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांनी स्पष्टपणे या सगळ्या घडामोडींबाबत भूमिका मांडलेली नाही. मलिक यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मी कालच्या पत्राबद्दल भूमिका मांडेल” असं अजित पवारांनी सांगितले.
काय आहेत नवाब मलिक यांच्यावर आरोप
नवाब मलिक यांना गोवावाला कंपाउंडमधील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 23 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते जेलमध्ये होते. मात्र सध्या त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.