जयपूर – चार वर्षांपूर्वी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या पत्नींना अथवा कुटुंबियांना मदत देण्याबाबत अशोक गेहलोत यांचे राजस्थान सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप केला जात आहे. शहीद रोहितेश लांबा यांची पत्नी मंजू जाट, शहीद हेमराज मीना यांची पत्नी मधुबाला पत्नी आणि शहीद जीतराम गुर्जर यांची पत्नी सुंदरी देवी गेल्या अनेक दिवसांपासून जयपूरमध्ये माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करत आहेत. मात्र पायलट किंवा मुख्यमंत्री गेहलोत यांनी अद्याप त्यांची भेटही घेतलेली नाही.
मंजू जाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पोलिसांनी तिला मारहाण केली, तिचे कपडे काढले आणि तिला पिनने टोचले. आमच्या पतीने देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली तरिही हे सरकार देशाच्या हुतात्म्याच्या सन्मानार्थ केलेल्या घोषणांची पूर्तता करत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या प्रकरणाबाबत माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासोबतच केंद्रीय जल ऊर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना घेराव घातला आहे. तर शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या धरणे आंदोलनाबाबत आता राजस्थान महिला आयोगही गंभीर दिसत आहे. महिलांवरील पोलिसांच्या क्रूरतेच्या आरोपाबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी राजस्थानच्या डीजीपींना वैयक्तिकरित्या या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे.
यासोबतच वीरांगनांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासही पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. या वीरांगनांना भाजपचे खासदार किरोडीलाल मीना यांनी पाठिंबा दिला असून जोपर्यंत सरकार आश्वासनांची पूर्तता करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे खासदार मीना यांनी सांगितले.
दरम्यान याबाबत बोलताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, शहीद आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वोच्च आदर दाखवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राजस्थानमधील प्रत्येक नागरिक शहिदांचा आदर करण्याचे कर्तव्य बजावतो, परंतु भाजपचे काही नेते आपल्या राजकीय भाकरी भाजण्यासाठी शहीदांच्या वीरांचा वापर करून त्यांचा अनादर करत आहेत. शहीद हेमराज मीना यांच्या पत्नीला त्यांचा पुतळा चौकाचौकात बसवायचा आहे; तर यापूर्वी शासकीय महाविद्यालय सांगोडच्या परिसरात आणि त्यांचे मूळ गाव विनोद कलान येथील उद्यानात मीना यांचे दोन पुतळे बसविण्यात आले आहेत.
शहीद रोहिताश लांबा यांची पत्नी तिच्या मेव्हणीसाठी अनुकंपा नियुक्तीची मागणी करत आहे. शहीद लांबाच्या भावाला नोकरी दिल्यास सर्वच वीरांगनांचे नातेवाईक कुटुंबातील इतर सदस्यांना नोकरी देण्यासाठी अवाजवी सामाजिक आणि कौटुंबिक दबाव टाकू शकतात. अशा स्थितीत शहीद जवानांच्या मुलांच्या हक्कावर गदा आणणे आणि इतर नातेवाईकांना नोकऱ्या देणे हे कसे समर्थनीय ठरेल? शहीदांची मुले प्रौढ झाल्यावर त्यांचे काय होईल?