नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाला भगवान राम किंवा धर्मावर मक्तेदारी सांगता येणार नाही. लोकसभेची निवडणूक भावनिक मुद्द्यांवर लढवण्यापेक्षा लोकांच्या प्रश्नावर लढवली पाहिजे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीला पुर्ण बहुमत मिळेल आणि ही आघाडी केंद्रात सरकार स्थापन करेल असा विश्वासही पायलट यांनी व्यक्त केला आहे. पीटीआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
भाजपची चारशे पारची घोषणा ही फुशारकीची घोषणा आहे त्यात तथ्य नाही असेही त्यांनी नमूद केले. तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यावर पहिल्या शंभर दिवसात आपण काय करू हे बोलण्यापेक्षा भाजपने गेल्या दहा वर्षांचे रिपोर्ट कार्ड सादर करावे असे आव्हान त्यांनी दिले. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्यांना पंगु करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्य विरोधी पक्षाची खाती गोठवण्याची सरकारने केलेली जबरदस्ती अभूतपूर्व आहे. हे निरोगी लोकशाहीसाठी चांगले नाही, असेही ते म्हणाले.
हे सर्व घडत असूनही, आमचा मतदारांवर विश्वास आहे, काँग्रेस कशासाठी उभा आहे याची त्यांना जाणिव आहे आणि ४ जून रोजी निवडणूक निकालांची मोजणी होईल तेव्हा इंडिया आघाडीने बहुमत मिळवलेले असेल असे ते म्हणाले. सध्या भाजप बॅकफुटवर गेलेला दिसतो आहे असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
राम मंदिराची लाट उत्तर भारतात पसरत असल्याच्या दाव्यांबद्दल विचारले असता, पायलट म्हणाले, मला वाटते की ही निवडणूक आपल्या वर्तमान आणि भविष्याशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर लढली जाईल.
देशातील संवैधानिक संस्था पद्धतशीरपणे कमजोर करण्याचा सरकारचा प्रयत्न हा आमचा मुख्य मुद्दा असेल. पायलट म्हणाले की, भारतीय मतदार धर्म, हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद या मुद्द्यांवर आधारित निवडणुकीच्या अजेंडाचे समर्थन करतात असे मला वाटत नाही. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी धर्मावर किंवा प्रभू रामावर त्यांची मक्तेदारी असू शकत नाही. राम सर्वांचा आहे, तो सर्वव्यापी आहे आणि त्याला पक्ष किंवा सरकारच्या मर्यादित चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थच आहे.
मंदिराचे बांधकाम एखाद्या पक्षामुळे किंवा सरकारमुळे झाले नसून, न्यायालयाच्या अंतिम निकालामुळे झाले, जो निकाल सर्वांनाच मान्य व कौतुकास्पद होता, असे त्यांनी नमूद केले.