रायपूर – यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ घटणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी शनिवारी केला. दक्षिणेतून साफ; उत्तरेतून हाफ अशी भाजपची स्थिती होणार असल्याचे भाकित त्यांनी केले.
आपण बॅकफुटवर गेल्याची जाणीव भाजपला पहिल्या टप्प्यातील मतदानामुळे झाली आहे. देशाच्या उत्तर विभागात सध्या त्या पक्षाकडे असलेल्या जागा निम्म्याने घटतील. तर, दक्षिण आणि पूर्व विभागांत तो पक्ष खातेही उघडू शकणार नाही, असे छत्तीसगढ दौऱ्यासाठी दाखल झालेले पायलट विमानतळावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आताची निवडणूक परिवर्तनासाठी आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मागील दहा वर्षांत केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन जनतेने केले आहे. आता चांगल्या पर्यायाची गरज असल्याचे जनतेला वाटू लागले आहे. तसा पर्याय कॉंग्रेस आणि इंडिया आघाडी उपलब्ध करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. पहिल्या टप्प्यातील मतदानातून अतिशय सकारात्मक संकेत मिळत आहेत. त्यातून आम्हाला यश मिळेल असे वाटते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.