पिंपरी – भारतीय नौदलात भरती होण्याच्या स्वप्नाला नशिबाचे आणि परिस्थितीचे अनेक अडथळे होते. परंतु या अडथळ्यांपेक्षा तिची इच्छाशक्ती आणि कतृत्त्व मोठे होते. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण, पुढील शिक्षण घेत तिने नौदलात अग्निवीर अंतर्गत एसएसआर पदावर नियुक्ती प्राप्त केली. नौदलाचा गणवेश परिधान करुनच ती आपल्या घरी परतली. ही यशोगाथा आहे काळेवाडी येथे राहणाऱ्या धनश्री देवानंद खांबे या तरुणीची.
धनश्रीचे कुटूंब मुळ सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे (ता. वाळगा) गावचे. धनश्रीचे वडील इलेक्ट्रिशियनची कामे करतात, तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती जेमतेमच. भारतीय सैन्य दलात जाण्याचे स्वप्न धनश्री लहानपणापासूनच बाळगून होती. पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने सैन्यदलात भर्ती होता यावे यासाठी कोल्हापुरमधील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे विज्ञान शाखेतून पदवी करत असताना एनसीसीमध्येही लक्ष केंद्रीत केले. त्या ठिकाणी ती मुलींबरोबर रूमवर राहायची. ती एनसीसीच्या 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनची कॅडेट होती. दरम्यानच्या काळात नौदलात जागा निघाल्या होत्या.
या पदासाठी आवश्यक असलेली शारीरिक व लेखी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर केरळमध्ये प्रशिक्षण पूर्ण केले, नौदलाचा गणवेश धारण करुनच ती घरी परतली. त्यावेळी फटाके वाजवून व फुलांची उधळण करून तिचे स्वागत करण्यात आले.
मी मुलगा-मुलगी असा कधीच भेद केला नाही. माझ्या दोन्ही मुलींना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण दिले. धनश्रीचे सैन्यदलात भर्ती होण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तिने खूप प्रयत्न केले. आमच्या घरात कोणीच सैन्यदलात नव्हते. धनश्रीने देशसेवेसाठी वाहून घेतले. याचा आम्हाला खूप अभिमान आहे.
-देवानंद खांबे, धनश्रीचे वडील.