खड्डे आणि विखुरलेल्या खडीने प्रवासी त्रस्त; प्रशासन सुस्त
कर्जत – तालुक्यातील धालवडी- पिंपळवाडी दरम्यान तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पसरली असुन जागोजागी खड्डे पडले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे दुचाकी वाहने चालविणे कठिण झाले आहे. उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
धालवडीवरुन राशिनला जाण्यासाठी पिंपळवाडी मार्गे जावे लागते. मात्र या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी बाभळी वाढल्याने प्रवाशांना काट्यांचे फटकारे सहन करीत प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल होत असल्याने वाहने रस्त्यात अडकुन पडत आहेत. पिंपळवाडी तसेच धालवडी या ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी आपल्या हद्दीतील रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून मुरुमीकरण काम केल्याने त्यातून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र सध्या त्यांचीही दुरवस्था झाली आहे.
धालवडी ते पिंपळवाडी दरम्यान सुमारे अर्धा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण काम मोठ्या प्रतिक्षेनंतर पूर्ण झाले. मात्र पुढील रस्त्याच्या कामाला किती प्रतिक्षा करावी लागते हा नागरिकांचा प्रश्न आहे. धालवडी तसेच परिसरातील लोकांना राशिन येथे आठवडे बाजारासाठी याच मार्गाने जावे लागते. मात्र रस्ता पक्का नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. सर्व काम पूर्ण झालेले नसल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. रस्ता खराब असल्यामुळे वाटसरूंना त्याचा त्रास होत आहे. छोट्या-मोठ्या अपघातांमुळे अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे.
रस्त्याच्या अर्धवट राहिलेल्या कामामुळे ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. सुमारे 25-30 वर्षापुर्वी झालेल्या खडीकरण कामानंतर त्याची कसलीच दुरुस्ती झाली नसल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. मैल कामगार रस्त्यावरील खडी बाजुला काढणे, झुडपे तोडणे अशी काहीच कामे करीत नाहीत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा.
मोहन सुपेकर, चेअरमन, धालवडी- राक्षसवाडी सेवा सोसायटी