मुंबई – मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेलं पत्र आणि त्या पत्राला ठाकरेंनी दिलेलं उत्तर यामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच आता याप्रकरणावरून विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्राचा ‘दुर्दैवी’ असा उल्लेख करत शिवसेनेसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मंदिरांवर अन्याय होतो याचे आश्चर्य
यावेळी बोलताना फडणवीस यांनी हिंदुत्ववादी म्हणावणारा पक्ष सत्तेत असतानाही मंदिरांवर अन्याय होतो हे आश्चर्य वाटण्यासारखे असल्याचं म्हंटलं.
ते म्हणाले, “शिवसेना स्वत:ला हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई लढत असल्याचं सांगतो. पण त्यांच्या सत्तेच्या काळात मंदिरांवर अन्याय होतो याबद्दल आश्चर्य वाटते.”
मुख्यमंत्र्यांचं पत्र दुर्दैवी
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचा ‘दुर्दैवी’ असा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांनी, “राज्यपालांकडे जी निवेदनं येत असतात, त्यासंबंधी पत्र लिहून ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्या पत्रांबाबत मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा असतो. पण मुख्यमंत्री उद्धव यांनी ज्याप्रकारे पत्र पाठवलं आहे, ते दुर्दैवी आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.
नेमकं काय आहे प्रकरण?
राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, ‘तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक, मग देव कुलुपबंद का? तुम्हाला दैवी संकेत मिळतात का?’ असे प्रश्न विचारले होते. या पात्राला प्रतिउत्तर देताना ठाकरे यांनी, ‘मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही. मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही असं म्हंटलं आहे.