नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भाजपवाले संपूर्ण देशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच मोदी सरकारकडून कोणतेही विकासकामे करण्यात येत नसल्याने विरोधकांनी संघटीत होणे महत्त्वाचे आहे. देशात आपण एकत्र निवडणुका लढल्यास देशाच्या विकासासाठी चांगले होईल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले. यामुळे एकजुट होणे गरजेचे असून त्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नितीश कुमार यांनी बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची ही भेट सुमारे 40 मिनिटे चालली. 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विरोधी पक्ष नेत्यांना एकत्रित आणण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नितीश कुमार सध्या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची एकजूट हे या संवादाचे प्रमुख कारण आहे. जेणेकरून 2024 मध्ये भाजपचा विजय रथ रोखता येईल.
नितीशकुमार यांनी गेल्या महिन्यात बिहारमध्ये भाजपसोबतची युती तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून विरोधक सातत्याने एकजुटीवर भर देत आहेत. मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही किंवा त्यासाठी इच्छुकही नाही, परंतु भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात विरोधी पक्षांना एकत्र करणे हे ध्येय, असे नितीश कुमार म्हणाले होते.
शरद पवार यांची भेट घेण्यापूर्वी नितीशकुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांची भेट घेतली होती. तसेच याआधी नितीश कुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचीही भेट झाली होती. तसेच गेल्या सोमवारी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांचीही नितिश यांनी भेट घेतली होती. शिवाय, मंगळवारी ते दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनाही भेटले होते. यातून देशपातळीवर विरोधी पक्षाचा एकोपा तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे.