मुंबई – सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 24 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यापाऱ्याने आजारी असताना मेरठपर्यंत रेल्वेप्रवास केल्याचे उघड झाल्याने त्याच्या संपर्कात आलेल्यांचाही आता शोध सुरु आहे, इतरांचा जीव धोक्यात घालणारा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही, ‘कोरोना’संदर्भात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
आज,राज्यात ७ नवे रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्ण संख्या १९३ झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातले २४ जण आणि अमरावती जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यासह कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतरांचा जीव धोक्यात घालून बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 29, 2020
मुंबई, नवी मुंबई, राज्यातील अनेक शहरांच्या बाजारपेठेत आजही खरेदीसाठी गर्दी होते आहे. यामुळे ‘कोरोना’संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या मर्यादित ठेवायची असेल तर, राज्यातील प्रत्येकाने ‘लॉकडाऊन’चे पालन करुन घरातंच थांबावे. खरेदीसाठी गर्दी करु नये. परराज्यातील मजूरांनी आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करुन जीव धोक्यात घालू नये. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.