चेअरमन अशोकराव पाटील यांची माहिती
सणबूर – ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या मरळी ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने सन 2018-19 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन 2722 रूपयांप्रमाणे सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
कारखान्याने सन 2018-19 च्या गळीत हंगामात 1 लाख 96 हजार 315.307 मेट्रीक टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.78 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 2 लाख 30 हजार 575 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन 2018-19 च्या गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्रति मेट्रीक टन 272 रूपये इतकी असल्याचे पत्रकात म्हटले आहे. एफआरपीप्रमाणे आतापर्यंत 5109.26 लाख रूपयांची रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली होती. उर्वरित एफआरपी प्रमाणे रक्कम 234.44 लाख रूपये कारखान्याने ऊस पुरवठादारांच्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील खात्यावर वर्ग केलेली आहे.
सद्यस्थितीला सन 2018-19 च्या गळीत हंगामातील कारखान्याकडे ऊसबिलाची एफआरपीची रक्कम थकीत नाही. एफआरपी प्रमाणे शिल्लक असणारी रक्कम ऊस पुरवठादारांच्या बॅंक खाती जमा केली असल्या बाबतचे लेखी पत्र बॅंकेच्या तपशिलासह साखर आयुक्त, जिल्हाधिकारी व तहसीलदार पाटण यांना सादर करण्यात आले आहे.
गळीत हंगाम संपल्यापासून गेले 6 महिन्यात साखरेची बाजारातील कमी झालेली मागणी वेळोवेळी विक्री दरामध्ये झालेला बदल कामगारांची देणी, वाहतूक खर्च वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2018-19 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफ.आर.पी.रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅंक खाती वर्ग केली आहे. दरम्यान साखर आयुक्तांनी महसूल वसूली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीचे कारखान्यास काढलेले आदेश पाहून कारखान्याला सतत पाण्यात पाहणाऱ्या अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. परंतु ऊस पुरवठाधारकांचा कारखाना व्यवस्थापनावर विश्वास असल्याने या आदेशाची काळजी न करता कारखान्याच्या विश्वस्थांच्या मागे खंबीर उभा राहिला याचा आम्हाला आनंद आहे.