पुणे – इंच…इंच जागा बळकवण्यासाठी नाल्यांवर वाढती अतिक्रमणे, महापालिकेला हाताशी धरून जागोजागी वळवलेले नाले आणि गल्लीबोळांचे झालेले कॉंक्रिटीकरण, ड्रेनेज तसेच नाल्यांमध्ये अडकलेले प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचऱ्याने पूरस्थिती उद्भवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण जास्त असले, तरी मानवनिर्मित या अतिक्रमणांमुळे शहराच्या दक्षिण भागाला नदी नसतानाही पूर अनुभवण्याची वेळ आली.
बुधवारच्या पावसाचा सर्वाधिक फटका आंबिल ओढा परिसराला बसला. शहरातील सर्वांत मोठा असलेला हा ओढा पेशवेकालीन असून कात्रज तलाव, बिबवेवाडी, धनकवडी, सहकार नगरमार्गे आंबिल ओढा वसाहत, दत्तवाडी आणि पुढे वैकुंठ स्मशानभूमी मागील बाजूने मुठा नदीला जोडला जातो.
सन 2003 नंतर या ओढ्याचा गळा घोटला गेल्याचे वास्तव आहे. ज्या भागातून हा ओढा गेला, त्या प्रत्येक भागात ओढ्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमणे झाल्याची कबुलीच आयुक्तांनी पावसानंतर दिली आहे.
ओढा फक्त डीपी नकाशावर
हा ओढा फक्त महापालिकेच्या डीपी नकाशापुरताच उरला आहे. ओढ्यासह नाल्यांवरील अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने 2009 मध्ये या सर्वांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर त्याचा समावेश डीपीमध्येही केला. मात्र, डीपीत सुमारे 20 ते 22 मीटर नकाशात असलेला हा ओढा प्रत्यक्षात काही मोजक्याच ठिकाणी तेवढ्या रुंदीचा आहे. तर, उर्वरित ठिकाणी तो काही फूटच शिल्लक असून तो अनेक ठिकाणी वळवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने त्याला काही ठिकाणी अधिकृत मान्यता दिली असून अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे हे काम झाले आहे.
सिमेंट रस्तेही जबाबदार
बुधवारी रात्री आंबिल ओढ्याचे पाणी पात्राबाहेर आले. मात्र, त्याच वेळी इतर भागातील पाण्याचीही त्यात भर पडली. ज्या दक्षिण पुण्यात हा पाऊस झाला, तेथे जवळापास 65 टक्के रस्ते सिमेंटचे आहेत. त्यामुळे येथून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. ते पुढे ड्रेनेजमधून पुन्हा या ओढ्यात आणि तर जागा मिळेल तिथे ते उताराच्या दिशेने घुसत होते.