दिलीप वळसे पाटील यांची तहसीलदार जोशी यांना सूचना
मंचर (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत आंबेगाव तालुक्याच्या तहसीलदार रमा जोशी यांना विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सूचना केली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी यांनी दिली.
संजय गवारी म्हणाले की, पश्चिम आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे गेल्या वर्षी पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे मोठ्या प्रमाणात भात, नाचणी, वरई शेती पिकांचे नुकसान झाले होते. वळसेपाटील यांनीं संबंधित भागाचा दौरा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली होती; परंतु अनेक दिवस शेतकऱ्यांनी मागणी करुनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नव्हते. ही रक्कम तहसीलदार यांच्या नावे जमा झाली असून गेले अनेक दिवस तहसील कचेरीत शेतकऱ्यांच्या याद्या जमा होवूनही पैसे जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पूर्वीची नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे यावर्षी तरी नुकसानभरपाई मिळेल का? याबाबात शेतकऱ्यांना शाश्वती राहिलेली नाही.
प्रकाश घोलप, संजय गवारी, नंदकुमार सोनावले, सुभाषराव मोरमारे यांच्या शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात नुकसानभरपाईचे पैसे जमा असूनही त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याची बाब विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्या निदर्शनास आणुन दिली. याबाबत वळसे पाटील यांनी तहसीलदार रमा जोशी यांना फोनकरून संबंधित नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत
सांगितले आहे.
आदिवासी भागातील काही शेतकऱ्यांचे बॅंक खाते क्रमांक नव्हते. तसेच काही बॅंक खाते क्रमांक चुकीचे होते. त्यासंदर्भात सर्व दुरुस्त्या करून बॅंक खात्यात पैसे जमा करण्यासंदर्भात आठ दिवसांत कार्यवाही करण्यात येणार आहे.
– रमा जोशी, तहसीलदार