बिजापूर – ज्यांच्या डोक्यावर पोलिसांनी एक ते तीन लाख रुपयांचे बक्षीस लावले होते असे सात नक्षलवादी आज छत्तीसगड सरकारला शरण आले. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांनी आज राज्याच्या बस्तर भागाचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरजी यांच्यापुढे आपली शस्त्रे ठेवली.
माओवादी विचारसरणीविषयी आमचा भ्रमनिरास झाल्याने आणि वरिष्ठ नक्षलवादी खालच्या स्तरावर काम करणाऱ्या नक्षलवाद्यांचीच पिळवणूक करीत असल्याने आम्हाला शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
रामजी ऊर्फ बिच्चेम करम (वय 24), उदांती आणि लखमु मोडियम (वय 32) अशी यातील काही प्रमुख नक्षलवाद्यांची नावे आहेत. रंजीता ओयाम, राजकुमारी यादव आणि हंगा पोडियामी अशी शरण आलेल्या तीन महिला नक्षलवाद्यांची नावे असून त्यांना पकडून देण्यासाठी सरकारने एक लाख रुपयांचे इनाम त्यांच्यावर लावले होते.
रानीबोडली भागात सन 2007 साली पोलीस पथकावर नक्षलवाद्यांच्या झालेल्या हल्ल्यात 55 पोलीस जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्यात या शरण आलेल्या नक्षलवाद्यांचाही हात होता.