प्रलंबित प्रश्नाबाबत सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या मागणीनंतर संजीवराजेंची घोषणा
सातारा – राज्यात बहुतांश जिल्हा परिषदांनी सर्वसाधारण सभेत ठराव करुन अनुकंपा भरती प्रक्रिया घेतली. मात्र, सातारा जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती प्रक्रिया गेली बरेच दिवस रखडल्यामुळे सर्वसाधारण सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही प्रक्रिया तात्काळ राबवून संबंधितांना न्याय द्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली. याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरअखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषदेत अनुकंपाखाली 79 आणि ग्रामपंचायतींमध्ये अनुकंपाखाली 24 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ही प्रक्रिया थंडावली होती. भरती प्रक्रिया राबवून संबंधिताना न्याय द्यावा, अशी मागणी सदस्यांमधून वारंवार होत होती. मात्र, याद्या अद्यावत नसल्याचे कारण सांगत ही भरती प्रक्रिया होत नव्हती. त्यातच लोकसभा निवडणूक व त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने प्रक्रिया करता आली नाही.
शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेत याबाबत सदस्यांनी आवाज उठवला. याबाबत झालेल्या चर्चेत सदस्य मानसिंगराव जगदाळे, रमेश पाटील, बापूसाहेब जाधव, अर्चना देशमुख, मंगेश धुमाळ आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. रमेश पाटील म्हणाले, “राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन अनुकंपा भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातही त्याप्रमाणे प्रक्रिया राबवावी.’ अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, “अनुकंपा भरती बाबतच्या याद्या तयार करण्याचे काम सुरु आहे.
डिसेंबरअखेर जिल्हा परिषदेत अनुकंपाखाली 79 आणि ग्रामपंचायतींमध्ये अनुकंपाखाली 24 कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया राबवून त्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.’ दरम्यान अनुकंपा भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, याबाबत संघटनेच्या वतीने सदस्यांना निवेदन देण्यात आले होते. याबाबत काय होतेय हे पाहण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची शुक्रवारी जिल्हा परिषदेत उपस्थिती होती. अनुकंपा भरतीची घोषणा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.