पाचगणी – सांगली, मिरज, पंढरपूर, नाशिक या एसटी बसेस बंद करुन महाबळेश्वर आगाराने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना ब्रेक लावला आहे. मात्र, महाबळेश्वर आगाराच्या या निर्णयामुळे प्रवाशांसह पर्यटकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे. महाबळेश्वर आगाराच्या या आडमुठे धोरणाबद्दल संताप व्यक्त केला जाऊ लागला असून तात्काळ या बसेस पुन्हा सुरु करण्याची मागणी होत आहे.
महाबळेश्वर आगाराने सांगली, मिरज, पंढरपूर, नाशिक, भरघोस उत्पन्न देणाऱ्या एसटी बसेस कोणतेही कारण न देता अचानक बंद केल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रकारास महाबळेश्वर आगारातील व्यवस्थापनाचा ढिसाळपणा जबाबदर असून याचा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना बसला आहे.
महाबळेश्वर आगाराने सकाळच्या सत्रातील साडेआठ वाजता सुटणारी महाबळेश्वर-सांगली, त्यानंतरची नाशिक, दुपारी एक वाजता सुटणारी महाबळेश्वर-मिरज, दुपारी अडीच वाजता सुटणारी मेढा मार्गे पंढरपूर या आगाराला अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या बसेस व्यवस्थापनाने अचानक कोणतेही कारण न देता बंद केल्या आहेत. त्यामुळे महाबळेश्वर, पांचगणी परिसरातील सातारा या ठिकाणी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्याचबरोबर सातारा येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
महाबळेश्वर, पांचगणी पर्यटनस्थळ असल्याने परजिल्ह्यातून असंख्य नागरिक पर्यटनस्थळी भेट देण्यास येत असतात. परंतु आगार व्यवस्थापनच्या अनागोंदी कारभारामुळे या उत्पन्न देणाऱ्या बसेस बंद झाल्या आहेत. या बंद केलेल्या बसेस पूर्ववत सुरू करण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
महाबळेश्वर आगारातील सांगली, पंढरपूर या एसटी बसेस चालक वाहकांच्या अपुऱ्या संख्येमुळे खंडाळा डेपोस वर्ग करण्यात आल्या होत्या. परंतु आता पुन्हा सांगली गाडी महाबळेश्वर आगाराकडे वर्ग करण्यात आली असून लवकरच पूर्ववत सूरु करण्यात येणार आहेत.
आगार व्यवस्थापक, महाबळेश्वर