मुंबई – जयप्रकाश नारायण यांची चळवळ, दलित, आदिवासी, श्रमिकांच्या चळवळ महाराष्ट्राने जवळून पाहिली आहे. समाज या चळवळीकडे कसा पाहतो यापेक्षा शासन याकडे कसे पाहते हे महत्वाचे आहे.
कारण देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. या काळात जो काही संवाद जनता आणि सरकार यात होत होता, तो पूर्णपणे संपुष्टात आणण्याचे काम केंद्रातील सरकारकडून होत आहे.
लोकशाही आज ठोकशाहीकडे चाललेली दिसत आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला आहे.एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मेधा पाटकर बोलत होत्या.
या मुलाखतीत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. मेधा पाटकर म्हणाल्या, चळवळी हा एक स्तंभ आहे. ही एक लोकशाही मूल्याची चौकट आहे.
मूल्यांच्या चौकटींवर नवीन धोरणांमुळे हल्ले होत आहेत. देशातील भूकेली, तहानलेली कष्टकरी माणसे चळवळींचा मार्ग अवलंबतील. मात्र त्या चळवळी दडपल्या जात आहे.
जनचळवळींशी संवाद केंद्रीय सरकार संपुष्टात आणत आहेत. त्यासाठी ते करोनाचा वापर करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे व्हायरस तेच सोडत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
महापुरुषांची स्वप्न आपल्या सत्तेसाठी हे लोक धुळीस मिळवत आहेत. चळवळीशिवाय खरं राजकारण, समाजकारण चालू शकणार नाही.
आताही काही आंदोलन स्वातंत्र्याच्या चळवळींसारखीच होत आहेत.यात काही जण हौतात्म्य देखील पत्करत आहेत. चळवळींनी व्यापक समन्वयाची दिशा स्वीकारली आहे. आमचा स्वार्थ आमच्या समाधानात आहे.
आम्ही आंदोलनजीवी आहोतच. कुणी त्याला शिवी म्हणून दिली असेल तरी ती आमच्यासाठी देणगीच आहे, असेही मेधा पाटकर म्हणाल्या.