फलटण – तालुक्यातील सासकल, ताथवडा, तिरकवाडी या शासकीय वाळू ठेके दिलेल्या ठिकाणी शासनाने नेमून दिलेल्या करारातील अटी व शर्तीचे पालन वाळू ठेकेदार यांच्याकडून होत नसल्याने संबंधित वाळू ठेक्यावर नुकतेच पदभार स्वीकारणारे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2018-2019 या कालावधीत सातारा जिल्ह्यातील 31 वाळू घाटास राज्य पर्यावरण समितीने 22 मे रोजीच्या बैठकीत परवानगी दिली. यामध्ये फलटण तालुक्यातील सासकल, ताथवडा,तिरकवाडी या ठेक्यांचा समावेश असून वाळू ठेकेदार यांना अनेक अटी व शर्ती नेमूण देण्यात आल्या आहेत. मात्र त्याचे पालन संबंधित ठेकेदार करत आहे का? यांची पहाणी व नियंत्रण करण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी तसेच तहसीलदार यांच्यावर सोपविण्यात आली. नेमून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन प्रत्यक्षात संबधित ठेकेदार यांच्याकडून होत नसल्याने वैध वाळू ठेक्याच्या ठिकाणी अवैध वाळू उपसा होत असल्याने शासनाने नेमून दिलेल्या करारनामा यांचे पालन होत नसल्यास वाळू ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
यापूर्वी फलटण तालुक्यातील पाडेगाव व जिंती या वाळू ठेक्यांमध्ये पाटबंधारे विभागाकडून काही विभागाने काही ठेकेदारांना वाळू उपसा करण्याची परवानगी दिली होती. या ठेकेदाराकडून चार ते पाच पोकलेन दिवस रात्र लावून हजारो ब्रासचा उपसा झाला असून नेमून दिलेल्या ब्रासपेक्षा अधिक ब्रासचा उपसा नियमबाह्य पध्दतीने वाळूचा उपसा झाला आहे. तसेच ही वाळू ज्या ठिकाणी वापरण्याची अट होती. त्या ठिकाणी न वापरता खाजगी ठिकाणी विक्री झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. यानंतर सदरचे दोन्ही वाळू ठेके बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश दिले होते.
पाटबंधारे विभागाने पाडेगाव व जिंती याठिकाणी घेतलेले वाळू ठेके ठेकेदाराना देताना कोणत्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा झाला असल्याचे दिसून आल्याने अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन अक्षरशः पिटाळून लावले. यामुळे निनावी कोणीतरी जिल्हाधिकारी कार्यालयात फोन केला मात्र त्याचीही दखल न घेतल्याने यामध्ये कुंपणच शेत तर खात नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित ठेकेदारांनी केलेल्या वाळू उपशाचा पंचनामा करुन याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तहसीलदार यांच्याकडून ताबडतोब मागवला होता. दोन्ही वाळू ठेकेदार यांनी नेमून दिलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन केले होते. तहसीलदार हनुमंत पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांना सादर केलेल्या वस्तुनिष्ठ अहवालात कोणत्या बाबी नमूद केलेल्या आहेत हे अजून गुलदस्त्यातच आहे.
मागील काही दिवसांपूर्वी फलटण उपविभागीय अधिकारी पदी शिवाजी जगताप यांनी पदभार स्वीकारला.
यापूर्वी उत्तर सोलापूर येथे काम करताना अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू सम्राटाचे चांगलेच कंबरटे मोडले होते. त्सासकल, ताथवडा, तिरकवाडी व यापूर्वी पाडेगाव व जिंती याठिकाणी बंद करण्यात आलेल्या वाळू ठेक्यावर भेट देऊन कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. आता येणाऱ्या काळात शिवाजी जगताप यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.