पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत सर्व 117 तर, तिसऱ्या टप्प्यात यूपीच्या 16 जिल्ह्यांतील 59 जागांवर मतदान झाले आहे. हा तिसरा टप्पा निर्णायक ठरणार आहे.
पंजाबच्या 16 व्या विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. परंतु, संत रविदास यांच्या जयंतीमुळे तारीख पुढे ढकलण्यात आली होती. 117 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 59 चा आकडा गाठावा लागेल. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर हे पटियाला शहर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ते गेल्या 4 वर्षांपासून पंजाबची सत्ता सांभाळत होते. मात्र कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदावरून त्यांची उचलबांगडी केली आणि त्यांनी आपला नवीन पक्ष काढला.
पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पूर्व अमृतसरमधून रिंगणात आहेत. कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली तर सिद्धू यांच्याकडे मोठी जबाबदारी असण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसने पंजाबची धुरा मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या हाती दिली आहे. पंजाब कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनाही मैदानात उतरविले आहे. 2019 मध्ये गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओल यांनी त्यांना पराभूत केले होते. शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते पाचवेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान हे मुख्यमंत्रिपदाचे उमदेवार आहेत, ते धुरी येथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यूपीमध्ये तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यांतील 59 जागांवर मतदान झाले असून दोन कोटी मतदार 627 उमेदवारांच्या नशिबाचा फैसला करतील. यातील 135 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यात सपाचे 52, भाजपचे 46 आणि बसपच्या 39 उमेदवारांचा समावेश आहे. 245 उमेदवार कोट्यधीश आहेत. यात सपाचे 90, भाजपचे 87 आणि बसपचे 78 उमेदवार आहेत. यूपीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीनंतर आता तिसऱ्या टप्प्यावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. निवडणुकीचा तिसरा टप्पा अनेक अर्थांनी रंजक मानला गेला. कारण या टप्प्यातील उमेदवारांची नावे केंद्रीय मंत्र्यांपासून माजी मुख्यमंत्र्यांपर्यंत आहेत.
या सर्व जागा राज्यातील भाजप आणि सपा या दोन्ही प्रमुख पक्षांसाठी आवश्यक आहेत. यातील अनेक जिल्हे एकेकाळी समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले होते. 2017 मध्ये भाजपने त्याला भगदाड पाडले. तेव्हा या 59 विधानसभा जागांपैकी भाजपने 49 जागा जिंकल्या होत्या. या वेळी सपापुढे आपला गड पुन्हा मिळवण्याचे आव्हान आहे, तर भाजपसमोर मागील विक्रमाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. या टप्प्यात हाथरस, फिरोजाबाद, एटा, इटावा, मैनपुरी, कासगंज, फारुखाबाद, कन्नौज, औरैया, कानपूर देहात, कानपूर नगर, जालौन, झांसी, ललितपूर, हमीरपूर आणि महोबा येथे निवडणुका झाल्या आहेत.
तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री प्रा. एसपी सिंह बघेल यांच्यासह अनेक दिग्गज स्वतः रिंगणात आहेत. योगी सरकारच्या तीन मंत्र्यांची विश्वासार्हताही पणाला लागली आहे. याशिवाय मुलायमसिंह यादव यांचे भाऊ या टप्प्यात निवडणूक लढवत आहेत. तिसऱ्या टप्प्यातील काही हॉटेस्ट जागा-
तिसऱ्या टप्प्यातील सर्वाधिक हॉट सिट म्हणजे मैनपुरीतील करहल सिट. माजी मुख्यमंत्री आणि सपा सुप्रिमो अखिलेश यादव यांनी येथून ताल ठोकली आहे. तर, भाजपने अखिलेश यादव यांचा धुव्वा उडविण्यासाठी केंद्रीय मंत्री एसपी बघेल यांना मैदानात उतरविले आहे. बघेल हे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे शिष्य, हे येथे उल्लेखनीय. करहलच्या जातीय समीकरणाबद्दल बोलायचं झालं तर येथे सर्वाधिक 1.35 लाख यादव मतदार आहेत. यानंतर 35 हजार शाक्य, 18 हजार बघेल, 12 हजार लोधी, 18 हजार ब्राह्मण, 25 हजार दलित, 18 हजार मुस्लीम मतदार आहेत. 2017 मध्ये समाजवादी पक्षाचे सोबरान सिंह यादव यांनी येथून भाजपच्या रामा शाक्य यांचा पराभव केला होता.
सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांचे धाकटे बंधू आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव इटावाच्या जसवंतनगर मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत. अखिलेश यांच्यावरील नाराजीमुळे त्यांनी स्वतःचा पुरोगामी समाज पक्ष स्थापन केला आहे. परंतु, आता ते सपाच्या तिकीटवर निवडणूक लढवित आहेत. मुलायमसिंग यादव यांनी समजूत घातल्यानंतर शिवपाल यादव थोडे मवाळ झाले आणि आपली तलवार म्यान करीत सपाच्या तिकिटावर मैदानात आहेत. तसं बघितलं तर, शिवपाल यादव पूर्णपणे उपेक्षित आहेत. मुलायमसिंग यादव यांचे व्याही अर्थात थोरले चिरंजीव प्रतीक यादव यांचे सासरे हरीओम यादव यांनी भाजपच्या तिकिटावर फिरोजाबाद जिल्ह्यातील सिरसागंज विधानसभा मतदारसंघातून ताल ठोकली आहे. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा यादव यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश घेतला होता. सपाने सर्वेश यादव यांना त्यांच्याविरोधात उतरविले आहे.
मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी कानपूरच्या महाराजपूर मतदारसंघातून मंत्रिमंडळातील सहकारी सतीश महाना यांना मैदानात उतरविले आहे. महाना गेल्या 35 वर्षांपासून भाजपचे आमदार आहेत. आता निवडून आले तर ते आठव्यांदा आमदार होतील. समाजवादी पक्षाने येथून 36 वर्षीय शीख उमेदवार फतेह बहादूर यांना तिकीट दिले आहे. महाना यांनी प्रतिकूल परिस्थितीतही येथून निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले आहे. मात्र यावेळी महाना यांना धूळ चारण्यासाठी फतेह बहादूर जीवाचे रान करीत अहेत. मैनपुरीच्या भोगाव मतदारसंघातून भाजपने योगी कॅबिनेट मंत्री रामनरेश अग्निहोत्री यांना उमेदवारी दिली आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत रामनरेश अग्निहोत्री यांनी या जागेवर भाजपचा झेंडा फडकविला होता. त्यांना मंत्री बनविण्यात आले. समाजवादी पक्षाने माजी मंत्री आलोक कुमार शाक्य यांना तिकीट दिले आहे.
कानपूरच्या कल्याणपूर मतदारसंघातून भाजपने योगी सरकारमधील राज्यमंत्री नीलिमा कटियार यांच्यावर विश्वास टाकला आहे. नीलिमा यांच्या आई प्रेमलता कटियार दीर्घकाळापर्यंत येथून आमदार होत्या. यावेळी नीलिमाचा मार्ग खूपच खडतर असणार आहे. नीलिमा यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे माजी आमदार सतीश निगम यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.
वंदना बर्वे