पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर परिसरात घडलेल्या पोर्श अपघातातील अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करून त्याला १४ दिवस बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. त्याचा बालसुधारगृहातील दिवस इतर बाल आरोपींप्रमाणेच गेला. त्याला इथे कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली नाही.
अपघात केल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात त्याला नातेवाइकांकडून पिझ्झा देण्यात आला होता, तसेच पोलिसांकडूनही व्हीआयपी ट्रीटमेंट मिळल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला होता.
मात्र, बालसुधारगृहात त्याला इतरांप्रमाणेच पोळी भाजी आणि वरण भात खावा लागला. जेवण झाल्यानंतर तो इतर मुलांबरोबर तासभर फुटबॉलही खेळला. पुण्यामध्ये नुकताच पोर्शे कार अपघात घडला आहे. या अपघातात २ निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला असून, त्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे; परंतु आरोपीचे वय १७ वर्षे असल्यामुळे त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर काही अटी शर्ती घालत आरोपीला बाल न्याय मंडळाकडून जामीनही मंजूर झाला.
एवढा मोठा अपघात घडवून आणलेल्या आरोपीला लवकर जामीन कसा मिळाला? हा प्रश्न सर्वसामान्यांतून विचारला जात होता. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी बाल न्यायमंडळात भक्कम बाजू मांडल्यावर त्याचा जामीन रद्द करून १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.
त्याचा बालसुधारगृहातील शुक्रवारी पहिला दिवस होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी नाश्त्याला पोहे होते, तर दुपारी साधी पोळी भाजी आणि वरण भात होत. त्याने हे जेवण व्यवस्थित केले. त्यानंतर दुपारी तो झोपायला गेला होता. येथे मुलांच्या पालकांना दर मंगळवारी भेटायची मुभा आहे, तर बाहेरचे कोणतेही खाद्यपदार्थ देण्यास मनाई आहे. सध्या बालसुधारगृहात विविध गुन्ह्यांतील ३४ मुले आहे. मुले पळून जात असल्यामुळे बालसुधारगृह नेहमीच चर्चेत असते.
विशाल अग्रवालची बॅड नाइट
विशाल अग्रवालची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. पहिल्याच दिवशी मीडियाने गराडा घातल्याने तो चांगलाच भेदरला होता. दरम्यान, त्याला कोठडीत इतर आरोपींप्रमाणेच फरशीवर चादर अंथरूण झोपायची सोय केली गेली, तसेच जेवणातही पोलिसांनी दिलेला डबा देण्यात आला. मात्र, मच्छर चावत असल्याने त्याने पोलिसांकडे गुड नाइट कॉइलची मागणी केली होती.
बाल न्याय मंडळ काय आहे?
१८ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या हातून जर काही गुन्हे घडले, तर त्यासंदर्भातील सुनावणीसाठी बाल न्याय मंडळ काम करत असते. आरोपी वयाने लहान असल्यामुळे इतर प्रौढ आरोपींच्या तुलनेत गुन्ह्याच्या कायदेशीर बाजू वेगळ्या पद्धतीने हाताळल्या जातात. बाल न्याय मंडळात एक न्यायाधीश आणि मुलांसंदर्भात सामाजिक क्षेत्रात काम करणारी अनुभवी व्यक्ती यांचा समावेश असतो. शिवाय महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारीही असतात. या सर्वांनी एकत्रितरीत्या अशा प्रकरणांत निर्णय घ्यायचा असतो.