पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मागील १५ दिवसांत सर्व स्थानक आणि ट्रेनमध्ये अनधिकृत विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्यातून सव्वातीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एक हजार ९४५ विना परवाना पॅकेज केलेल्या पाण्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध मागील तीन आठवड्यांपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमे दरम्यान पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर इत्यादी प्रमुख स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्येही ही मोहीम राबविण्यात आली. अनधिकृत विक्रेते शिजवलेले अन्न, अनधिकृत ब्रँडचे पॅकींग केलेले पिण्याचे पाणी, अस्वच्छ परिस्थितीत पॅक केलेले स्नॅक्स तसेच गाडीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर आणि परिसरात चहा/ कॉफीची विक्री करताना आढळले.
या मोहिमेदरम्यान एकूण ५६० अनधिकृत विक्रेते पकडण्यात आले. त्यापैकी ३५१ विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या विक्रेत्यांकडून सामूहिक दंड म्हणून ३ लाख १७ हजार ४२५ वसूल करण्यात आले. तर १ हजार ९४५ विनापरवाना पॅकेज केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, सहायक सुरक्षा आयुक्त, वाणिज्यिक निरीक्षक, खानपान निरीक्षक, तिकीट विभागीय कर्मचारी, चेकिंग कर्मचारी, आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची टीम तयार करून विशेष मोहीम राबवली आहे.
स्टाॅलची अचानक तपासणी…
रेल्वे स्थानकावरील केटरिंग स्टाॅल्सची अचानक तपासणी केली. तसेच प्रवाशांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन परवाना धारकांवर दंडात्माक कारवाई केली. स्टाॅल्सवरील कर्मचाऱ्यांचे राहणीमान आणि वर्तनाबाबतही सूचना दिल्या. यावेळी नऊ खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये कमतरता आढळल्यास कारवाई होणार, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.