वंदना बर्वे
गुजरात कॉंग्रेसकडे उघड्या डोळ्यांनी बघितलं, तर पंजाब आणि उत्तराखंडची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होत असल्याचीच जाणीव होईल.
यात किंचितही दुमत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी सामना करताना कॉंग्रेससह तमाम विरोधी पक्षांच्या नेत्यांना धाप लागली आहे. दोघांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्ष एकामागून एका राज्याची सत्ता आपल्या अधिपत्याखाली आणत आहेत. मात्र, विरोधक फारसं काही करू शकत नाही. याचा अर्थ अजिबात असा होत नाही की, सव्वाशे वर्षे जुन्या कॉंग्रेसनं आपली हत्यारे टाकून द्यावेत, तलवार म्यान करून टाकावी. गुजरात कॉंग्रेसमध्ये एवढ्यात जे काही घडत आहे त्याकडे लक्ष दिले, तर असेच वाटते की कॉंग्रेसने हात टेकले आहे, भाजपपुढेच नव्हे तर स्वपक्षातील नेत्यांपुढेसुद्धा.
कॉंग्रेसनं अंतर्गत कलहामुळे पंजाब आणि उत्तराखंडची सत्ता गमविली. दोन्ही राज्यांत कॉंग्रेसचं सरकार येणार अशी आशा होती. मात्र, पंजाबमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू तर उत्तराखंडमध्ये हरीश रावत आणि राज्यातील अन्य नेत्यांमधील सवती मत्सरामुळे हातची सत्ता गमाविली. हाच ड्रामा गुजरातमध्ये सुरू झाला आहे. हार्दिक पटेल कॉंग्रेसवर नाराज आहे आणि लाख तक्रारी करूनही हायकमांड ऐकत नसल्यामुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. गुजरातची विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी कॉंग्रेसमधील कुरबुरी अधिक तीव्रतेने चव्हाट्यावर येत आहेत.
गुजरात कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी ज्या प्रकारे पक्षावर निशाणा साधला आहे; त्यावरून असे लक्षात येते की ते कॉंग्रेस सोडण्याच्या पूर्ण तयारीत आहेत. ते कोणत्याही क्षणी पक्ष सोडून जाऊ शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. निवडणुकीच्या तोंडावर बडे नेते अशाप्रकारे ऐनवेळी पक्ष सोडून जायला लागले तर निवडणुकीचा निकाल काय लागू शकतो, याचा अंदाज बांधणे अवघड नाही. अर्थात, हार्दिक पटेल यांनी या आरोपाबाबत माध्यमांसमोर स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. महत्त्वाची बाब अशी की, हे सगळं डोळ्यापुढे घडत असताना कॉंग्रेस पक्ष ही परिस्थिती बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली करताना दिसत नाही. गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष एकामागून एका राज्यात कॉंग्रेसची जागा घेत आहे. अशात, कॉंग्रेस हायकमांडचं शांत राहणे समजण्यापलीकडचे आहे.
अर्थात, सध्या आठवड्याभरात दोन बैठका घेऊन आणि प्रशांत किशोर यांना दोन्ही बैठकीसाठी बोलावून कॉंग्रेस पुढचे नियोजन करत आहे. हार्दिक पटेल यांनी गुजरातचे नेते कशाप्रकारे कुरघोडी करीत आहेत याची तक्रार हायकमांडकडे केली आहे. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. पंजाबच्या धर्तीवर पक्षाला उद्ध्वस्त करू पाहणारे काही कॉंग्रेस नेते हायकमांडला चुकीची माहिती देत आहेत आणि यामुळे कॉंग्रेस कमकुवत होत चालली आहे. कॉंग्रेसचे आजी-माजी आमदार पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. निवडणूक जसजशी जवळ येईल तसा पलायनाचा वेग वाढत जाईल. कॉंग्रेसचे माजी आमदार प्रवीण मारू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार कामिनी राठोड यांनी उघडपणे कॉंग्रेसला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. 2017 मध्ये विजयी झालेल्या पक्षाच्या 16 आमदारांनी भाजपसह इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे याची कॉंग्रेस हायकमांडने साधी दखलसुद्धा घेऊ नये, ही आश्चर्याची बाब आहे, असे गुजरातमधील नेत्यांचे म्हणणे आहे.
कॉंग्रेसने मागच्या निवडणुकीत अल्पेश ठाकोर यांना पक्षात आणले होते. यानंतर ठाकोर यांना राष्ट्रीय सचिवही बनविण्यात आले होते. परंतु पक्षातील अंतर्गत कलहामुळे त्रस्त होऊन ठाकोर यांनी कॉंग्रेस सोडली. गुजरात कॉंग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी अलीकडेच कॉंग्रेस मुख्यालयाशी संपर्क साधला आणि गुजरातमध्ये बिघडत चाललेल्या परिस्थितीची माहिती दिली. गुजरात कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी राज्यातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर मानसिक छळ करण्याचा आरोप केला आहे, हार्दिकने याबाबत माहिती दिली होती. गुजरात कॉंग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी पदाधिकारी नेमले जात आहेत. या नेमणुका करताना कार्याध्यक्ष या नात्याने आपल्याला का विश्वासात घेतले गेले नाही? असा पटेल यांचा सवाल आहे. गुजरात कॉंग्रेसमधील सूत्रांनुसार, हार्दिक पटेल यांना कार्याध्यक्ष बनविल्यानंतर त्यांच्याकडे द्यायला पाहिजे तितके लक्ष दिले गेले नाही, हे अगदी खरे आहे. यामागे कॉंग्रेस नेत्यांची अंतर्गत लढाई आहे. गुजरातमध्ये कॉंग्रेसला कमकुवत करण्यात कॉंग्रेसच्याच बड्या नेत्यांचा मोठा हात आहे, असे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.
कॉंग्रेस हायकमांडला गुजरातमधील घडामोडींची माहिती नाही, असे अजिबात नाही; पण हायकमांडने सगळे काही रामभरोसे सोडले आहे, असे वाटते. निवडणुकीपूर्वी आपल्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे हायकमांड वागत आहे. मुळात, हा मुद्दा केवळ हार्दिक पटेलचाच नाही, तर कॉंग्रेसचे अन्य नेतेसुद्धा दुसऱ्या पक्षात सामील होत आहेत. याकडे पक्षाने लक्ष दिले पाहिजे. पक्षाने आता याकडे लक्ष दिले नाही, तर निवडणुका येईपर्यंत गुजरातमध्ये पक्ष पूर्णपणे कमकुवत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
गुजरातच्या नेत्यांचा तर्क आहे की, गुजरातमध्ये हार्दिक पटेल करिश्माई नेता नाही. त्यांची जादू आता चालत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणुकांमध्ये हार्दिक पटेल यांचा प्रभाव अजिबात जाणवला नाही. 2017 च्या पाटीदार आंदोलनात हार्दिक पटेल यांची तरुणांमध्ये जी क्रेझ बघायला मिळत होती ती आता राहिलेली नाही, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. अशी चर्चा आहे की, कॉंग्रेस आता पाटीदार समाजाचे दुसरे नेते खोडलधाम ट्रस्टचे प्रमुख नरेश पटेल यांना पुढे करण्याची तयारी करीत आहे. यामुळे हार्दिक पटेल नाराज आहे. कदाचित याच नाराजीमुळे हार्दिक पटेल आता दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारी करीत आहेत.
पाटीदार समाजाचा कोणताही दुसरा नेता कॉंग्रेस पक्षात सामील व्हावा आणि त्याने आपली बरोबरी करावी, असे हार्दिक पटेल यांना वाटत नाही. यामुळे हार्दिक पटेल कॉंग्रेसजनांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आहे. मुळात, कॉंग्रेसच्या मूळ कार्यकर्त्यांचे दुखणे हेच आहे की, पक्षाला भूतकाळात घडलेल्या कोणत्याही घडामोडींपासून चांगला धडा घ्यायचा नाही आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षात ज्या पद्धतीने कलह सुरू झाला त्यामुळे त्यांना पंजाबमधील सत्ता गमवावी लागली. उत्तराखंडमध्ये कॉंग्रेस नेत्यांची भांडणं आणि अंतर्गत वादामुळे हातातील सत्ता निसटली. याचीच पुनरावृत्ती आता गुजरातमध्ये होणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.