मुंबई : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आता पुन्हा एकदा मनसेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. अयोध्येतील दौऱ्यावरून राज ठाकरेंना आव्हान देताना दिपाली सय्यद यांनी “सभा घ्यायच्याच असतील, तर अयोध्येमध्ये घेऊन दाखवा. पुण्यामध्ये तर सिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून”, असं ट्वीट केलं होतं. यानंतर त्यांनी मनसेवर खोचक टीका करणारा व्हिडीओ संदेश जारी केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पुण्यात सभा घेणार असल्याचे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले होते मात्र पावसाची शक्यता असल्याने ही सभा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली. तसेच यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दीपाली सय्यद यांनी याच मुद्द्यावरून मनसेवर टीका केली आहे.
पावसाचे कारण देऊन मैदान सोडले
भोंग्याचे कारण देऊन देशपांडे पळाले
अयोध्याचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामु मिळाले.@mnsadhikrut @ShivSena— Deepali Sayed (@deepalisayed) May 18, 2022
दिपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले..आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले.. महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, असं दिपाली सय्यद या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.
दरम्यान, सभा रद्द करण्याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, राज ठाकरेंची सभा पुढील आठवड्याभरात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. राज ठाकरे स्वत: सभेचे ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचेही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.