कॉंग्रेसचे मोदी सरकारला आव्हान
नवी दिल्ली – देशातील वाढते आर्थिक घोटाळे आणि बिकट आर्थिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात आर्थिक आणिबाणी जाहींर करावी आणि आर्थिक स्थिती बाबत सरकारने श्वेत पत्रिका प्रसिद्ध करून नेमकी स्थिती लोकांपुढे मांडावी अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हताच धोक्यात आणली आहे असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते जयवीर शेरगील आणि गौरव वल्लभ यांनी आज पत्रकार परिषदेत केला. देशातील बॅंकांचे कर्ज बुडवण्याचे प्रमाण वाढले असून जाणिवपुर्वक हे कर्ज बुडवून फसवणूक करणाऱ्यांची नावे सरकारने जाहीर करावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. या साऱ्या आर्थिक घोटाळ्यांवर सरकारने श्वेत पत्रिका प्रकाशित करावी अशी मागणी त्यांनी केली. देश दिवसेंदिवस आर्थिक अनागोंदीच्या दिशेने जाताना दिसत आहे. सलग पाच तिमाहीत देशाची आर्थिक स्थिती खालावत जाताना दिसत आहे. विकास दर इतका खाली जाण्याची नेमकी कारणे काय आहेत हे सरकारने जनतेला समजाऊन सांगितले पाहीजे. या स्थितीला कोण जबाबदार आहे आणि ही स्थिती का निर्माण झाली आहे याची सरकारला माहिती आहे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
या स्थितीवर आता थातुरमातूर उपाययोजना करून चालणार नाही तर सरकारने काही तरी ठोस उपाययोजना त्यावर केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. देशाचे थांबलेले अर्थचक्र गुंतवणुकीत वाढ झाल्याशिवाय सुरळीत होणार नाही. सरकारने या बाबतीत केवळ दिखाऊपणा चालवला असून खोटी माहिती देऊन जनतेला अंधारात ठेवले जात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. बॅंकिंग क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षात 74 टक्क्यांनी वाढले असून त्यात तब्बल 71 हजार 543 कोटी रूपयांची संपत्ती अडकली आहे. रिझर्व्ह बॅंकेच्याच अहवालात हीं माहिती देण्यात आल्याचा दाखलाहीं त्यांनी यावेळी दिला.