कोलकाता – भाजपमध्ये द्वेषाचे राजकारण आणि भेदाभेद वाढल्यामुळेच आपण भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तृणमूल कॉंग्रेसचे नेते आणि बेलिगंज विधानसभा मतदार संघातील तृणमूलचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांनी म्हटले आहे. बाबुल सुप्रियो यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर थोड्याच दिवसात सुप्रियो यांनी खासदारकीचाही राजीनामा दिला होता.
भाजप सोडून तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल बाबुल सुप्रियो यांच्यावर सोशल मीडियातून टीका केली जात होती. त्याला त्यांनी प्रथमच ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. आपल्या या टीकेच्या पोस्टला सुप्रियो यांनी भाजपच्या पश्चिम बंगाल कार्यालयाच्या ट्विटर हॅन्डललाही टॅग केले आहे
पश्चिम बंगालची संस्कृती, परंपरा आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आपण काहीही करायला तयार आहोत, असे सुप्रियो यांनी जोर देऊन म्हटले आहे.
आपण कधीही संकुचित राजकारण केलेले नाही, यापुढेही मी तसे करणार नाही, हे असानसोलच्या जनतेला माहित आहे, असेही ते म्हणाले. 2018 मध्ये बर्धमान जिल्ह्यातील असानसोल येथील जातीय दंगल भडकावण्यात सुप्रियो यांचा हात असल्याचा आरोप कम्युनिस्ट पार्टीकडून केला जात होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिले आहे.