शेतकऱ्यांचा सवाल : मुख्यमंत्री ठाकरे यांनी आश्वासने पूर्ण करावी -भारत कृषक समाज
बारामती – दोन लाख रुपयापर्यंत पिक कर्ज माफ करण्याची घोषणा करून सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला;परंतु दुष्काळी मदत पीक विम्याचे काय असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावी अशी मागणी भारत कृषक समाजाच्या वतीने अध्यक्ष प्रकाश मानकर व उपाध्यक्ष भारत गावडे पाटील यांनी केली.
सततच्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करणारे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा करून या सरकारने दिलासा दिला आहे परंतु या घोषणेमुळे सहकारी बॅंकांना जास्त फायदा होणार आहे. शेतकरी अतिवृष्टीमुळे गारपिटीने आर्थिक डबघाईला आले आहेत. दुष्काळ अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली पिके बरबाद झाली आहेत .
त्यामुळे प्रती हेक्टर 25 हजारांची दुष्काळी मदत पोहोचविणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. शेतकऱ्यांना अजून पर्यंत मागच्या वर्षीच्या पीक विम्याचे पैसे तसेच दुष्काळी मदतीचे पैसे देखील अद्याप मिळालेले नाहीत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे अजून बहुतांश शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे आहेत . शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर काय असा सवाल देखील भारत कृषक समाजातर्फे करण्यात आला आहे.
सध्याच्या सरकारकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आशा आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागाचे दौरे करून शेतकऱ्यांच्या नाजूक परिस्थितीची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासन देखील दिले. शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी भारत कृषक समाजाच्या वतीने अध्यक्ष डॉ. प्रकाश मानकर, उपाध्यक्ष भारत गावडे पाटील, डॉ. रमेश ठाकरे, प्रशांत चौधरी, वसंत महाजन, जगतराव पाटील, गोविंद रोकडे, राजकुमार भट्टड, रामेश्वर माळी, राजेंद्र गावंडे माधव भारसाकडे आदींनी केली आहे.
दोन लाख रुपयांची मदत घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरीदेखील त्याची अंमलबजावणी मात्र मार्चनंतर होणार आहे. सध्य स्थितीत शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती हलाखीची असून नुकसानग्रस्त पिकांची मदत त्वरित मिळणे गरजेचे आहे, यासाठी प्रति हेक्टर पंचवीस हजार रुपयांची मागणी केली आहे. याबाबत अंमलबजावणी होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम सरकारने जमा करावी.
– भारत गावडे-पाटील, उपाध्यक्ष, भारत कृषक समाज