तरूणवर्ग आधारस्तंभ; गौरव नायकवडी जयंतरावांना अस्मान दाखवतील
निशिकांत पाटलांवर निशाणा
हॉस्पिटलच्या नावाने कारभारात आणि प्रचारात पण भ्रष्टाचार करणाऱ्या बांडगुळाला निवडणुकीनंतर युतीमध्ये स्थान मिळणार नाही, असा अचूक निशाणा उध्दव ठाकरे यांनी भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर साधला.
इस्लामपूर – जयंत पाटील यांनी निवडणूक जिंकण्यासाठी एक बांडगुळ उभा केले आहे. त्या दोघांनाही अस्मान दाखवत महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी चमत्कार घडवतील. मी शहरी बाबू आहे. मला शेतीतील काही समजत नाही, अशी अनेकदा टीका होते. पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू मला दिसतात. राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्त करु, असा विश्वास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारार्थ यल्लामा चौकातील सभेत ते बोलत होते. यावेळी ना. सदाभाऊ खोत, गौरव नायकवडी, खा. धैर्यशील माने, खा. संजय पाटील, माजी खा. निवेदिता माने, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख, महिला व बालकल्याण सभापती सुषमा नायकवडी, नंदिनी नायकवडी, नगरसेवक प्रदीप लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उध्दव ठाकरे म्हणाले, “”ही निवडणूक सोपी समजत अनेकांना आमचा उमेदवार लहान पोरगं वाटत आहे.
तोच निश्चित अस्मान दाखवेल. नवा विचार, क्रांती, देशसेवेची बिजे रक्तात असायला हवीत. नागनाथ अण्णांचा वारसा पुढे नेण्यासाठी अण्णांच्या अपेक्षांप्रमाणे काम करु. राजकारणात नवी पिढी यायला हवी. तरुण उद्याचे नव्हे तर आत्ताचे आधारस्तंभ आहेत. इस्लामपूरमधून गौरवसारखा उमदा तरुण जयंत पाटलांना अस्मान दाखवेल.”
सदाभाऊ खोत म्हणाले, “”गौरव नायकवडी यांच्या खांद्यावर शिवरायांचा भगवा आहे. वाळवा तालुका क्रांतीकारक व लढणाऱ्यांचा आहे. उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर विश्वास दाखवून गौरव नायकवडी यांना उमेदवारी दिली. हे वादळ मुंबईला आल्याशिवाय शांत राहणार नाही. धैर्यशील माने यांच्याप्रमाणेच गौरव नायकवडी ही नक्कीच परिवर्तन घडवतील.” इस्लामपूर मतदारसंघात परिवर्तनाची लाट आहे.
राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याने मोलाचे मत वाया जाऊ देऊ नका. सत्तेच्या बाकावर बसताना मतदार संघाचा कायापालट करणार असून एकदा विश्वास टाका, असे आवाहन गौरव नायकवडी यांनी केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख, वैभव नायकवडी, पृथ्वीराज पवार, प्रकाश शेडगे, शकिल सय्यद, वैभव शिंदे, बाबा सूर्यवंशी, अमोल पडळकर यांची भाषणे झाली. सभेस सीमा पवार, वीर कुदळे, अनिल माने, युवराज निकम, सागर मलगुंडे, राहुल टिबे, सुवर्णा मोहिते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रम पाटील यांनी स्वागत केले.