नवी दिल्ली – प्रचंड उष्णता, भूक आणि पाण्याची कमतरता याचा फटका लॉकडाउनच्या काळात स्वगृही स्थलांतरित मजुरांना बसला आहे. प्रवाशांचे अन्नपाण्याअभावी अतोनात हाल होत असून यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशातच श्रमिक विशेष रेल्वेमध्ये होणारे मजुरांचे मृत्यूच्या घटना या वेगवेगळ्या व किरकोळ असून त्यासाठी रेल्वे प्रशासनाचा दोषी धरता येणार नाही, असे मत भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केले आहे.
वृत्तांनुसार, श्रमिक रेल्वेमध्ये एकूण ९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. याचसंदर्भात बोलताना भाजपाचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले कि, काही दुर्देवी घटना नक्की घडल्या आहेत. मात्र त्यासाठी रेल्वे प्रशासनाला दोषी ठरवता येणार नाही. श्रमिकांच्या प्रवासासाठी रेल्वे त्याच्याकडून सर्वोत्तम सेवा देत आहे. काही जणांचे मृत्यू झाले आहेत पण ते वेगवेगळ्या घटनांमध्ये झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच प्रवाशांना मदतीची गरज असताना रेल्वेने कशाप्रकारे उत्तम प्रकारे काम कले आहे याची अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. काही छोट्या घटना घडल्या आहेत मात्र त्यामुळे रेल्वेसेवा बंद करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, घोष यांच्या या वक्तव्यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बंगालमधील विरोधीपक्ष असणाऱ्या तृणमूल काँग्रेस आणि माकपने (एम) (सीपीआय एम) आक्षेप नोंदवला आहे. हे वक्तव्य संवेदनशून्य असल्याची टीका केली आहे. भाजपा नेत्यांनी मजुरांना होत असणाऱ्या अडचणींबद्दल संवदेनशील असण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.