सोरतापवाडी – कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील प्रलंबित रेल्वे उड्डाण पुलाचे काम दोन वर्षांपासून बंद पडले आहे. गाड्या आल्यानंतर हे गेट वारंवार बंद करावे लागत आहे. यात अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना हे गेट बंद होत आहे. त्यामुळे काहीवेळ मृतदेहाला गाडी जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. ही मरणयातना साक्षात नागरिक भोगत आहेत. दरम्यान, पुलाचे काम मार्गी लागावे, यासाठी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे ग्रामपंचायतीने साकडे घातले आहे.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातून राज्यमार्ग क्र.117 जात आहे. या रस्त्याला पुणे – सोलापूर लोहमार्गावर रेल्वे गेट क्रमांक आठवर 2 वर्षापूर्वी उड्डाणपूल मंजूर झाला आहे. पुलाचे काम देखील सुरु करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव या पुलाचे काम बंद पडले आहे. त्यामुळे कोरेगाव मूळ गावातील व आसपासच्या 25 ते 30 गावांना या रस्त्यावरून रेल्वे गेट मार्गाने वाहतूक करावी लागते. मात्र, रेल्वे गेट बंद असल्यावर बऱ्याच वेळ गेटवर थांबावे लागत आहे. यामध्ये शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, शेतकरीवर्ग, नोकरदार, व्यावसायिक यांना मोठा फटका बसत आहे.
गावाशेजारी प्रयागधाम चॅरिटेबल हॉस्पिटल असल्याने तिथे देशातून व राज्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णवाहिकेस रेल्वे गेट बंद असल्याने वेळेअभावी बऱ्याच रुग्णांना त्रास झाला आहे. गावातील स्मशानभूमी मुळा – मुठा नदीच्या कडेने असल्याने रेल्वे मार्गापलीकडे ग्रामस्थांच्या कुटुंबातील अंत्यविधीच्या कार्यक्रमाच्यावेळी रेल्वे गेटवर दीड ते दोन तास थांबावे लागत आहे. त्यामुळे काही कुटुंबाकडे स्वमालकीची जागा असल्याने ते अंत्यविधी त्यांच्या स्वतःच्या जागेत करीत आहेत.
मात्र, ज्या कुटुंबाना जागा नाही, अशा कुटुंबाना अंत्यसंस्कार करण्यासाठी गावातच पर्याय आहे. राज्यमहामार्ग क्र.17 चे रुंदीकरण व नवीन रस्ता करण्याचे काम मंजूर असून हे काम देखील अद्याप सुरू करण्यात आले नाही. या रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडून सतत अपघात होत आहेत. पुलाचे काम मजूंर असून देखील हे काम होत नाही. या विषयांबाबत तत्कालीन सरकारकडे पाठपुरावा करून देखील उपयोग झाला नाही. त्यामुळे या भागातील गावकरी पुलाच्या प्रतीक्षेत आहेत.