नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी जळीत प्रकरणः युद्ध पातळीवर चौकशी सुरू
टाकळी ढोकेश्वर (वार्ताहर) – टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील केंद्र सरकारच्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनींना जाळण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारास पाच दिवस लोटले असतानाही हा प्रकार नेमका कशातून घडला, हे अद्यापपर्यंत गुलदस्तात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. चौकशीसाठी दिल्लीतील उपायुक्त येथे दाखल झाले आहेत.
ही घटना अतिशय गंभीर असल्याने दिल्ली येथील केंद्रीय मानव संसाधन विभागाचे उपायुक्त आर. मोहन व पुणे येथील नवोदय विद्यालय समितीच्या उपायुक्त अनुराधा यांनी आज विद्यालयास भेट देऊन जवळपास दोन तास प्राचार्य व शिक्षकांची बैठक घेतली. 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला काही अवधी बाकी असल्याने परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल व आम्ही आमच्या पातळीवर चौकशी करत असून, वरिष्ठांना तसा अहवाल सादर केला जाणार आहे, असे उपायुक्त आर. मोहन यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी जळीत प्रकरणातील दोन मुलींचे जबाब घेतले असून, अजून चौकशी चालू आहे, असे सांगितले. पालकांनी गर्दी केली होती. परीक्षा जवळ आल्याने मुली काहीही सांगण्यास तयार होत नसल्याने पालकांनी नवोदय विद्यालय समिती प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी प्राचार्य एस. पी. बोरसे, सीताराम खिलारी उपस्थित होते.
विद्यालयाचे चेअरमन जिल्हाधिकाऱ्यांची घटनेकडे पाठ
नवोदय विद्यालयामधील घटनेची खासदार सुप्रिया सुळे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली असून, प्रकरण गंभीर असल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली, तर दुसरीकडे नवोदय विद्यालयाचे चेअरमन हे जिल्हाधिकारी असताना त्यांनी या गंभीर प्रकरणाकडे पाठ फिरविली असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.