अकोले – कॅरेट म्यान तुकाराम दातीर यांनी गाजर उत्पादनाचा विक्रम नोंदविला आहे. तुकाराम मुरलीधर दातीर (रा. गणोरे, ता.अकोले) यांनी 30 गुंठे क्षेत्रातून 60 क्विंटल गाजराचे विक्रमी उत्पन्न काढले.
मागील चाळीस वर्षांपासून ते उपजीविकेसाठी शेती आणि पशुपालन हा व्यवसाय करत आहेत. निमबागायती दोन एकर वडिलोपार्जित शेती ते कसत असतात. शेतामध्ये काहीतरी वेगळे आणि नाविन्यपूर्ण करण्यावर त्यांचा भर असतो. त्यातूनच त्यांनी ही किमया साधली आहे.
आपल्या शेतीत ते पूर्वी मका, बाजरी, गहू, हरभरा ही पारंपारिक पिके ते घेत असे. त्यानंतर आढळा धरणाचे शेतीसाठी पाणी मिळायला लागल्यापासून वालवड, भोपळा, भुईमूग, कांदे, ऊस अशी पिके ते आलटून पालटून घेत आहेत.
सर्वात प्रथम त्यांनी 1990 साली गाजर शेतीला प्रारंभ केला. हमखास मिळणारा बाजारभाव आणि जनावरांना चारा या दोन्ही गोष्टी गाजर पिकातून साध्य होत असल्याने गाजराचे पीक सातत्याने ते आपल्या शेतावर घेत आहेत. त्यांच्या दृष्टीकोनातून गाजराचे पीक हे अत्यल्प खर्चात आणि कमी मेहनतीने पिकवता येते.
गाजर पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते हलकी जमीन ते यासाठी निवडतात. मुंबई बाजारपेठेत मागणी असलेले न्यू सिन करोडा वाण ते लागवडीसाठी निवडतात. चालू हंगामातही त्यांनी तीस गुंठे क्षेत्रासाठी 800 ग्रॅम बियाणे मागवले होते. मोसमी पाऊस झाल्यावर नांगरणी, वखरणी, पाळी ही जमीन मशागतीच्या कामे करून एक फूट अंतरावर सरी पाडून त्यांनी भाजीपाला बियाणे निर्मिती करणाऱ्या कंपनीचे 7 जुलै 2021 रोजी बियाणे पेरणी केले.
नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात ही पाऊस झाल्यामुळे गाजर सडू शकतात, अशी त्यांना काळजी लागली होती.एवढ्या मोठ्या क्षेत्रावर बहरून आलेले पीक हातातून जाते की काय? अशीही चिंता त्यांना वाटली. मात्र पावसाने उघडीप दिल्यावर त्यांनी परिसरातील रोजंदारीवर येणाऱ्या महिला मजूर घेऊन युद्धपातळीवर गाजराची काढणी सुरू केली. सहाव्या महिन्यातही गाजरे एवढा पाऊस होऊन खराब झाली नाही. रोज 3-4 क्विंटल गाजर मुंबई मार्केट विक्रीस भाजीपाला गाडीने पाठविले.
आतापर्यंत जवळपास 60 क्विंटल माल त्यांनी मुंबई मार्केटला विकला आहे. म्हणजेच 30 गुंठे क्षेत्रात विक्रमी 60 क्विंटल गाजराचे उत्पादन त्यांना मिळाले आहे. सरासरीपेक्षा आणि विद्यापीठाच्या नोंदी पेक्षाही हे उत्पन्न अधिक आहे. विद्यापीठाच्या नोंदीनुसार एकरी चार टन उत्पन्न मिळणे अपेक्षित असते. त्याऐवजी सहा टन उत्पन्न त्यांनी घेतले आहे. तीस गुंठे क्षेत्रातून त्यांना आतापर्यंत झालेल्या विक्रीतून 90 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. खर्च वजा जाता 70 हजार रुपये त्यांना मिळाले आहेत. याशिवाय जनावरांसाठी दर्जेदार व पौष्टिक चाराही उपलब्ध झाला आहे.