सातारा, (प्रतिनिधी) – दरवर्षी वार्षिक परीक्षा संपल्या की सातारा शहरातील राजवाडा परिसरातील गांधी मैदानावर असलेल्या राजवाडा चौपाटीवर खवय्यांची प्रचंड गर्दी होऊ लागते. त्यातच आता एक मेला शालेय वर्गाच्या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेचे निकाल हाती आल्यानंतर या खवय्येगिरीला अधिकच उधान येते.
परर्गावाहून तसेच परप्रांतातून आलेल्या पै -पाहुण्यांना तसेच खवय्यांना या राजवाडा परिसरातील विविध खाद्यपदार्थांची चव चाखायला घालणे म्हणजे सातारकरांना एक अनोखा आनंदच मिळतो.
पूर्वी अगदी चार ते पाच टपरीवजा फूड स्टॉलवर हे खवय्या लोक येऊन भेळ, पाणीपुरी, आईस्क्रीमचा आस्वाद घेत असत. मात्र आता याच परिसरात जवळजवळ शंभरहून अधिक खाद्यपदार्थांचे स्टॉल खवय्या यांना आकर्षित करत आहेत.
चटपटीत भेळ ,पाणीपुरी, रगडापुरी, सँडविच ,कटलेट ,फ्राय पोटॅटो विविध प्रकारचे आईस्क्रीम्स, दक्षिण पद्धतीचे डोसे, उत्तपे, मेदुवडे तसेच गुजरातची कच्ची दाबेली पावभाजी, रगडा पॅटीस तसेच चायनीज आणि कॉन्टिनेन्टल पदार्थाचे स्टॉलही या परिसरात लक्ष वेधून घेत असतात. खमंग हुरडा पिठाचे थालीपीठ तसेच विविध प्रकारच्या मलई कुल्फी ,सॉफ्टी आईस्क्रीम, मिल्क शेक, बदाम शेक, थंडाई आधी आईस्क्रीमचे प्रकारचे स्टॉलही या परिसरात लक्ष वेधून घेणारे ठरतात.
आता उन्हाळ्याची सुट्टी त्यात चटपटीत कैरी घातलेली भेळ, टेस्टी पावभाजी आणि एकदा सुरू केली की न थांबता येण्याजोगी खाण्याइतकी पाणीपुरी खाण्यासाठी आबालाची या परिसरात गर्दी होत आहे . निवडणुकीचा हंगाम संपला आहे आणि आता या परिसराला अधिकच वेगळी झळाळी प्राप्त झाली आहे.
रात्री अकरापर्यंत सुरू असलेल्या याचा चौपाटीवर सकाळपासूनच पुरी भाजी, मिसळ, वडापाव, वडा सांबार, कांदा भजी, बटाटा भजी, गोल भजी असे अनेक प्रकारच येतात. मात्र खऱ्या अर्थाने सायंकाळी सहाच्या पुढे या चौपाटीला एक वेगळेच उधान येते.
छोट्या छोट्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर चारी बाजूने उभा राहून या ठिकाणी विविध पदार्थांचा घ्यावयाचा पै पाहुण्यांसोबतचा आस्वाद हा खरोखरच अनोखी पर्वणी ठरतो. त्यामुळे आता येत्या 15 जून पर्यंत सुट्टी संपते तोपर्यंत हा खवय्याचा नजारा अधिकच रंगत जाणार आहे हे मात्र नक्की.