खटाव (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून खटाव ता.खटाव परिसरातसह अन्य परिसरात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली असल्याचे व सुर्य नारायण कोपले असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यातही भरीस भर म्हणून विजेचा लपंडाव अधून मधून सुरू आहेच. उष्णतेचा पारा मात्र वाढत चालल्याने जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.
दुपारच्या वेळेत तर बाजारपेठेत देखील शुकशुकाट जाणवत आहे. रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. गारवा मिळवण्यासाठी शेतातील त्रस्त जीव झाडांची सावली व गारवा शोधत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर घरातील लोक पंखे,कुलर,एसी लावून कृत्रिम गारवा शोधत असल्याचे निदर्शनास येत आहे.वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नये असे तज्ञ सांगत आहेत.
सध्या शेतकऱ्यांची सुगी संपलेली आहे. काही शेतकरी जनावरांसाठी लागणार चारा जमवून व्यवस्थीत लावण्यात व्यस्त आहेत. तर काही शेतकरी आले , कांदा आदी नगदी पिकांच्या काढणीत व्यस्त आहेत. वाढत्या उष्णतेमुळे शेतात काम करणारा मजूर वर्ग व शेतकरी मात्र पुरता त्रस्त झाला आहे.
दुपारच्या वेळी उष्णतेने त्रस्त झालेले जीव झाडांची सावली शोधत आहेच शिवाय तहानलेल्या जीवास थंडावा मिळावा म्हणून पिण्यासाठी थंड पाणी अथवा अन्य थंड पेयं कुठं उपलब्ध होत आहे का ते पहात आहेत. प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत आहे की ‘या वर्षीचा उन्हात लयंच कडक हाय गड्या .
विजेच्या सततच्या खंडित होण्याने उकाड्याने त्रस्त झाले जिवांची मात्र अधिकच तगमग होत आहे.लोक बरसणाऱ्या वरूनराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत.अशा वेळी थंड हवेची एखादी झुळूक उष्णतेमुळे त्रासिक झालेल्या जीवास थंडावा व गारवाची नव्हे तर थकल्या भागल्या जीवास नवसंजीवनी देणारी ठरत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
पाण्याची पातळी खालावली
वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची पातळी देखील दिवसेंदिवस खालावत चालली आहे.गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार (जिहे-कटापूर) सिंचन योजनेमुळे परिसरात जनतेला काही काळ दिलासा मिळाला होता. सध्या परिसरातील बहुतांश भागात पाण्याची पातळी खालावली असल्याचे दिसून येत आहे. परिसरातील लोकांना शेतीसाठी लागणाऱ्या पाणी दूरचं पिण्याच्या पाण्यासाठी देखील कसरत करावी लागत आहे.
आरोग्याची काळजी घ्यावी
सध्या वाढत्या उष्णतेमुळे अनेक आजार बळावत आहेत.वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते, उष्माघात होऊ शकतो.लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आरोग्य संदर्भात काही तक्रारी असल्यास त्वरित जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात. डॉ.पराग रणदिवे, वैद्यकीय अधिकारी, खटाव