लोणंद, (प्रतिनिधी) – तुळजापूर येथून पायी चालत आणलेल्या नायगाव, शिरवळ व लोणंद येथील अंबिकामाता देवीच्या सासनकाठ्यांचे लोणंद नगरीत शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सासनकाठ्यांच्या दर्शनासाठी लोणंद व परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे लोणंद नगरीला यात्रेचे स्वरुप आले होते.
खंडाळा तालुक्यातील नायगाव, शिरवळ व लोणंद येथील भक्त देवीच्या सासनकाठ्या घेवून तुळजापूरला पायी चालत जातात व परत चालत येतात. तुळजापूरहून परत गावी येताना वाटेत ठिकठिकाणी या काठ्यांचे स्वागत करण्यात येते.
आज सकाळी लोणंद गावात काठ्यांचे शास्त्री चौकात आगमन झाल्यानंतर पारंपरिक पध्दतीने ग्रामस्थांनी काठ्यांचे खण नारळाने ओटी भरुन पूजन केले. यावेळी लोणंदकरांनी काठीबरोबर आलेल्या भक्तांचे स्वागत केले. त्यानंतर लोणंदकर नागरिकांनी या सासनकाठ्यांची गुलालाची उधळण करत व ढोल लेझीमच्या निनादात शास्त्री चौक, जुनी पेठ, तानाजी चौक, विठ्ठल मंदिर, जगदंबा मंदिर या मार्गावरुन भव्य मिरवणूक काढली .
या काठ्यांच्या स्वागतासाठी म्हस्कोबानाथाची काठीही गांधी चौकात आणली होती. पारंपरिक पध्दतीने स्वागत केल्यानंतर ही सासनकाठी या मिरवणुकीत सहभागी झाली. यावेळी काठ्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. नवस बोललेल्या भक्तांनी काठ्यांना नारळ, खोबरे व नोटांची तोरणे बांधली तर काहींनी खणा-नारळाने ओटी भरली.
काठ्यांबरोबर आलेल्या शेकडो आराधी भक्तांना भाविकांनी मीठ, पीठ, मिरची, तेल आदी वस्तूंचा शिधा दिला. या काठ्या गांधी चौकातून जुन्या पेठमार्गे तानाजी चौकात जात असताना या रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. ढोल-लेझीमच्या तालावर नाचत या काठ्या पुढे जात होत्या.
सकाळी सात पासून सुरु असलेला हा काठ्यांचा सोहळा दुपारी एक च्या सुमारास खेड बुद्रुकच्या दिशेने मार्गस्थ झाला. तानाजी चौकाच्या परिसरात मेवा, मिठाई, खेळणी आदींची दुकाने लावण्यात आली होती. लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
आज अंबिकामाता सासनकाठ्यांच्या दर्शनास आलेल्या महिला भाविकांच्या किमती वस्तूंवर व दागिन्यांवर गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे, तर एकाचे पाकीट तर दोघांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याने दर्शनासाठी आलेल्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.