पुणे हे विद्येचे माहेरघर आहेच, याशिवाय संस्कृतीचेही माहेरघर असल्याने परंपरा, सणसमारंभ येथे प्रामुख्याने धुमधडाक्यात साजरे होताना आपण पाहतो. त्यातून पुण्याचा गणेशोत्सव तर जगाच्या पटलावरच मान्य झाला आहे. या गणपतीचीही मांदियाळी पुण्यात विविध नावांच्या स्वरूपात पाहायला मिळते. शक्तीची उपासना करण्यासाठी समर्थ रामदासांची जशी मारुतीच्या मंदिरांची स्थापना पुणे आणि परिसरात केली. तशीच अनेक वाड्यांमध्ये, मंदिरे स्थापून गणाधिशाचीही स्थापना केलेली दिसते. अशी अनेक मंदिरे पुण्यामध्ये आहेत. पहिले पाच मानाचे गणपती आणि नंतर कालानुरूप प्रसिद्ध झालेले काही गणपती सर्वश्रुत आहेत. परंतु याशिवाय अनेक सुंदर आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले गणपती आणि गणपतीमंदिरेही पुण्यात आहेत. त्याविषयी दहा दिवस थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न…
काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेले पुण्यातील मध्यवस्तीत असलेले त्रिशुंड गणपती मंदिर हे मध्ययुगीन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना समजले जाते. शनिवारवाड्यावरून साततोटी पोलीस चौकीजवळ गेल्यानंतर नागझरीचा छोटा पूल आहे, त्यावरून उजव्या दिशेने गेल्यास लगेचच हे संपूर्ण दगडी मंदिर दृष्टोत्पत्तीस येते. एवढ्या गजबजलेल्या ठिकाणी सुंदर कोरीवकाम असलेले हे मंदिर पाहून स्तिमित व्हायलाच झाले नाही तरच नवल.
शहरात तीन सोंड असलेला असा हा एकमेव गणपती आहे. या मंदिरातील कोरीवकाम हे अतिशय दुर्मीळ आहे. मंदिराच्या दर्शनी भागात खाली हत्तींची दगडी शिल्पे आहेत तर साखळदंडांनी बांधलेला गेंडा त्याला नेणारे सैनिक, हातातील बंदुका, असे दृष्य पाहून आपल्याला चकित व्हायला होते. मंदिर बांधणीच्या काळात इंग्रजांनी आसाम-बंगाल हा भाग ताब्यात घ्यायला सुरुवात केली होती. त्याचे प्रतीक या शिल्पांत उमटले असावे, असे म्हटले जाते.
गर्भगृहात मोरावर बसलेली त्रिशुंड गणेशाची विलोभनीय मूर्ती असून, मूर्तीमागे शेषाशायी भगवानांची साडेतीन फूट उंचीची मूर्तीही आहे. त्रिशुंड गणेशाची उजवी सोंड मोदकपात्रास स्पर्श करणारी, मधली सोंड पाटावर रुळणारी; तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करणारी आहे. मंदिराच्या आतील शिल्पकामही अद्वितीय, असे आहे.
त्रिशुंड गणपती मंदिर हे पुण्यातले मठ आणि मंदिर या स्वरूपातले एकमेवाद्वितीय, असे मंदिर आहे. गजलक्ष्मी, तळघर, जलस्रोतांकडे जायचे मार्ग, शिलालेखातले उल्लेख, लिंगोद्भव शिल्प, आपापल्या वाहनांसह असणारे शंकर-पार्वती या सगळ्याच गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. वस्तुत: भगवान शंकरांचे मंदिर करताना गणरायाची स्थापना कशी झाली, हे माहीत नाही. परंतु येथे हे वैशिष्ट्य दिसते.
मंदिराच्या मुख्य द्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला लगेचच तळघरात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. येथे जिवंत समाधी असून गणपतीच्या अभिषेकाचे पाणी समाधीवर पडेल, अशी व्यवस्था केली आहे.
या समाधीचे दर्शन वर्षातून केवळ एकच दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी घेता येते. या भागात गोसाव्यांची वस्ती होती, अशी नोंद आहे; त्यामुळे ही समाधी गोसावींची असल्याचे सांगितले जाते. या समाधीच्या जवळ उपासनेसाठी दालने असून तेथून नागझरीपर्यंत जाण्यासाठी रस्ते आहेत. जेणेकरून उपासना करताना कोणाशी संपर्क येऊ नये. तसेच गाभाऱ्यातूनही समाधीला जाण्यासाठी मार्ग आहे. मंदिराच्या शिलालेखात सन 1754 मध्ये हे मंदिर बांधल्याचे नमूद केले आहे. तर, दुसऱ्या बाजीरावाने 1810-11 साली दक्षिणा ठेवलेल्या मंदिराच्या यादीत या मंदिराचे नाव “दलपत गोसावी समाधी मंदिर’ असे लिहिले होते.