आ. मकरंद पाटील यांच्या प्रशासनास सक्त सूचना
शिरवळ – तालुक्यात सुरू असणाऱ्या संततधारेमुळे बळीराजा हवालदिल झाला असून प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा न दाखविता बाधित क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करावेत व धोकादायक पुलांचे प्रस्ताव पाठवावेत त्यास बजेट मधून मंजुरी घेतली जाईल अशा प्रशासनास सक्त सूचना करत आ. मकरंद पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात गत काही दिवसांपासून पावसाची संततधार अखंडपणे सुरु असून आपत्तीग्रस्त व पूरग्रस्त भागाची पाहणी आ. मकरंद पाटील यांनी पाहणी केली.
यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, जि.प.सदस्य उदय कबुले, पंचायत समिती सभापती मकरंद मोटे, लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय भोसले, तहसिलदार दशरथ काळे, कृषी अधिकारी पिंगट, वीज वितरणचे अभियंता शिर्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोदी यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, सततच्या सुरु असणाऱ्या पावसाने बळीराजा हवालदिल झाला असून खरिपाचा हंगाम वाया जाणार आहे. तरी प्रशासनाने पावसाने बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे तात्काळ करावेत. तसेच अनेक ठिकाणी गावांना जोडणाऱ्या पुलांची उंची कमी आहे.
यामुळे पावसाळ्यात जीवघेणा प्रवास संबंधित ग्रामस्थांना करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने अशा पुलांचे प्रस्ताव तयार करावेत येत्या बजेटमधून त्यास मंजुरी मिळवून घेण्यात येईल. याचबरोबर अनेक गावातील घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्याचेही पंचनामे करण्यात यावेत अशा प्रकारे प्रशासनास सुचित करण्यात आले. यावेळी लोहोम, कन्हेरी, लिंबाचीवाडी, झगलवाडी, घाडगेवाडी, जवळे, कवठे यासह अन्य गावातील नुकसानीची पाहणी करण्यात आली.