मुंबई : कोरोनाच्या संकटाशी सामना करता करता आता निसर्गाने नवे संकट महाराष्ट्रासमोर उभे केले आहे. ते संकट म्हणजे चक्रीवादळाचं ! हवामान खात्याने हे चक्रीवादळ उद्या म्हणजेचं 3 जून ला पश्चिम किनारपट्टीच्या भागावर धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
येत्या 3 दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार पाऊसासह चक्रीवादळ येण्याची शक्यता असल्याने तेथील मच्छिमारांनी आपापल्या बोटी जेट्टीवर लावण्याचे काम सुरू केले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून महाराष्ट्रावर मोठा धोका असल्याचा इशारा मिळाल्याने या चक्रीवादळा पूर्वी राज्यातील विविध ठिकाणी एनडीआरएफ च्या 10 टीम सज्ज झाल्या आहेत.
पालघरमध्ये 2, मुंबईत 3, ठाण्यात 1, रायगडमध्ये 2, रत्नागिरीत 1 आणि सिंधुदुर्गात 1 अशी ही पथके तैनात करण्यात आली असून 6 पथके राखीव ठेवण्यात आलेली आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण केला आहे. आता त्यातच येणाऱ्या चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे उपासमारीची वेळ त्यांच्यावर येण्याची शक्यता आहे. योग्य ती खबरदारी घेत या संकटाला सामोरे जाण्यासाठी मुंबई महापालिकेने उपाययोजना केल्या आहेत.