नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनचे संकट आपले हात पाय चांगलेच पसरत आहे. तर दुसरीकडे याच परिस्थितीवरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका केली असून त्यांनी पंतप्रधानांचा कारभार हा भंगारापेक्षा जरा वरच्या दर्जाचा असल्याची उपहासात्मक टीका केली आहे.
अमेरिकी मूडीजने भारताचे पतमानांकन खाली खेचतानाच देशाला कमी विकास दर व सरकारला वाढत्या वित्तीय तुटीचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला आहे. देशाच्या गुंतवणूकविषयक आवश्यक अशा वातावरणासाठीचे सार्वभौम पतमानांकन मूडीजच्या गुंतवणूक सेवा विभागाने सध्याच्या बीएए२ वरून बीएए३ असे कमी केले आहे. करोना संकटाचे आव्हान पेलण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनांच्या निर्धोक अंमलबजावणीबाबतही मूडीजने शंका उपस्थित केली आहे. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारभार भंगारापेक्षा जरा बरा, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.
मोदींचा कारभार भंगारापेक्षा जरा वरच्या दर्जाचा असल्याचे मूडीजचे रेटिंग आहे, अशी उपहासात्मक टीका राहुल गांधींनी केली आहे. गरीब आणि एमएसएमई क्षेत्राला मदतीच्या अभावाचा अर्थ असा आहे की पुढे स्थिती आणखी खराब होणार आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. मूडीजने यापूर्वी, नोव्हेंबर २०१७ मध्ये भारताचे पतमानांकन बीएए३ वरून बीएए२ असे उंचावले होते.
तब्बल १३ वर्षांच्या कालावधीनंतर देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सुधारणा झाल्याचे मत याद्वारे मांडण्यात आले होते. भारताचा चालू वित्त वर्षांचा विकास दर शून्याखाली राहण्याचा अंदाज अनेक वित्तसंस्था, दलालीपेढय़ा तसेच पतमानांकन संस्थांनी व्यक्त केला आहे. गेल्या वित्त वर्षांत भारताची अर्थप्रगती गेल्या ११ वर्षांच्या सुमार स्थितीतील राहिल्याचे गेल्याच आठवडय़ातील आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.