औरंगाबाद – तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारात वाढ होत असून पोलिसांनी प्रभावीपणे कारवाई करत सायबर आणि आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.
पोलीस आयुक्तालयात आयोजित औरंगाबाद शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबतच्या आढावा बैठकीत गृहमंत्र्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्यासह शहर पोलीस यंत्रणेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पोलीसांनी समाजातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अधिक सक्रीयपणे तपास मोहिम राबवावी जेणेकरुन गुन्हेगारांना शिक्षा होण्यात वाढ होईल, यादृष्टीने कारवाई करण्याचे निर्देशित करुन गृहमंत्र्यांनी सायबर गुन्ह्यासोबतच नागरिकांचे विविध पध्दतीने होणारे आर्थिक फसवणूकीचे गुन्हे रोखण्यास प्राधान्य देऊन गुन्हेगारांमध्ये जबर निर्माण करावी.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखत नागरिकांना पोलीस प्रशासनामार्फत अपेक्षित सहकार्य तातडीने उपलब्ध होईल याची खबरदारी बाळगावी, असे सूचित करून वळसे पाटील यांनी विविध समाजमाध्यमांद्वारे दैवते, प्रसिध्द व्यक्ती, समाजपुरुष यांची बदनामी करणाऱ्या आक्षेपार्ह प्रसारणाचे प्रमाण सध्या वाढत असून त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग प्रयत्नशील असून अधिक परिपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पूरक सूचना, उपाय असल्यास सादर करावे तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या सामान्य माणसाला आपुलकीची वागणूक आणि न्याय देण्याच्या जबाबदारीतून पोलीसांनी कृतीशील रहावे.
पोलीस कॉन्सटेबल पोलीस प्रशासनाचा कणा असून त्याच्या मानसिक, शारीरिक यासोबतच कौटुंबिक स्वास्थ्याची काळजी घेतली जावी. शहरामध्ये मनपासह इतर विविध निवडणूका येत्या काळात नियोजित असून त्या कायदा व सुव्यवस्थेच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडतील याची खबरदारी घेत नियोजन करावे. कोरोना काळात पोलिसांनी स्वत:ची तसेच कुटुंबाची जोखीम पत्करत अहोरात्र काम केले आहे, त्याबद्दल सर्व पोलिसांचे अभिनंदन करुन कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करावी, असे गृहमंत्र्यांनी सूचित केले.
पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी शहर पोलीसामार्फत राबविण्यात येत असलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणी अंतर्गत तपास मोहीम, दामिनी पथक, ट्राफिक हेल्पलाईन, प्रतिबंधात्मक कारवाई, शहरात संवादी तसेच सौहार्दाचे वातावरण ठेवण्यासाठी पोलीसामार्फत सुरु करण्यात आलेल्या भरोसासेल, सिटीजनसेल, सिटीजन सेंट्रीक पोलीसींग यासह राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.