मंचर,(प्रतिनिधी) – शिरूर लोकसभेचे माजी खासदार तथा सध्याचे इच्छुक उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जुने सहकारी मित्र व सध्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबर एकाच गाडीत प्रवास सव्वा तास प्रवास केला आहे. या प्रवासा दरम्यान दोघांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत खलबत झाली असल्याची चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर या जुन्या मैत्रीला बहर आल्याचे कमेंट केले जात आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळाच्या विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडवणीस यांच्यासह सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर आढळराव पाटील हे मंत्री वळसे पाटील यांच्या गाडीत येऊन बसले.
त्यावेळी गाडीत कुणीही नव्हते. वढू बुद्रुकपासून आंबेगाव तालुक्यातील अवसरी फाट्यापर्यंत आढळराव पाटील व वळसे पाटील यांनी एकत्र प्रवास केला. पुढे अवसरी फाट्यावर उतरून आढळराव पाटील हे त्यांच्या लांडेवाडी येथील निवासस्थानी गेले तर वळसे पाटील हे त्यांच्या मंचर येथील निवासस्थानी गेले.
दरम्यान, अवसरी फाट्यावर वळसे पाटलांच्या गाडीतून आढळराव पाटलांना अनेकांनी उतरताना पाहिले आहे. कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकत्र काम करणारे हे दोन जूने मित्र राज्यात बदललेल्या राजकीय घडामोडी नंतर पुन्हा एकत्र येणार या दृष्टीनेच त्यांचा एकत्र प्रवास झाला असावा व शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत खात्रीशीर चर्चा झाली असावी असा अंदाज बांधला जात आहे.
आज पक्षप्रवेश करणार?
राज्यात विविध लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसून या जागेसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र या जागेसाठी अजित पवार यांनी दावा ठोकला असल्याने आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात असताना त्याच दृष्टीने वळसे पाटील व आढळराव पाटील यांची चर्चा झाली असावी.
दरम्यान, अजित पवार यांची सोमवारी (दि. 4) मंचर येथे येणार असून जाहीर सभा होणार आहे. अजित पवार यांच्या स्वागतासाठी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उद्योजक देवेंद्र शहा यांच्याबरोबर शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील हेही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या सभेत मंचावर दिसणार का, की अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील पक्षात प्रवेश करून त्यांची उमेदवारी जाहीर होणार का ? याबाबतही मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
19 वर्षांनंतर मैत्रीला आला बहर
वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्यामध्ये 2004 साली त्यावेळी असणार्या खेड लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून आढळराव पाटील इच्छुक असताना त्यांना उमेदवारी न देता अशोकराव मोहोळ यांना उमेदवारी दिल्याने आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत खेड लोकसभा मतदारसंघाची शिवसेनेकडून उमेदवारी हस्तगत करत निवडून येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला.
तेव्हापासून वळसे पाटील आणि आढळराव पाटील यांच्या मैत्रीमध्ये राजकीय वितृष्ट आल्याने दोघांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला. सुमारे 19 वर्षांनंतर या दोघांच्या मैत्रीला वढू कोरेगाव ते अवसरी फाटा या प्रवासाने बहर आला आहे.