लॉकडाऊन शिथिल होताच पुणेकर सुसाट
पुणे – लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर शुक्रवारी पुणेकर रस्त्यांवरून अक्षरश: सुसाट सुटले. त्यामुळे शुक्रवारी प्रत्येक रस्त्यांवर गर्दीच गर्दी असे चित्र दिसले. मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील रस्त्यांवरही वाहनांची गर्दी होती. त्यामुळे अनेक ठिकाणी कोंडी पाहायला मिळाली. गेले तीन महिने सामसूम असणाऱ्या आप्पा बळवंत चौकातील पुस्तकांच्या दुकानांत पालकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. आपले व्यवसाय दीर्घकालाने सुरू केल्याने अनेक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.
त्याचवेळी शहरातील दुकानदार सॅनिटाझर आणि व्यक्तिगत अंतराचे निकष पाळताना दिसत होते.
लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत असले, तरी कडक निर्बंधातून महापालिकेने 24 जुलैपासून शिथिलता दिली आहे. या आधीही शिथिलता देण्यात आली होती. मात्र, 13 जुलै रोजी पुन्हा कडक लॉकडाऊन करत सगळे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ते निर्बंध शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजता शिथिल झाले आणि पहाटेपासून नागरिकांचा लोंढा अक्षरश: रस्त्यावर उतरला.
वाहनांची कोंडी, गर्दी, वस्तू खरेदीची धांदल, भाजी मंडयांमध्ये गर्दी, किराणा दुकान आणि अन्य गरजेच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी गर्दी केली. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक बाहेर आल्याने, रस्त्यांवर वाहनाची गर्दी झाली. कोणतेही सिग्नल सुरू नसल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. यावेळी पोलीस काही ठिकाणी उपस्थित होते.
पथारींच्या उत्साहावर पावसाचे पाणी
पथारी व्यावसायिकांनाही व्यवसायासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र सकाळी 11 वाजताच सुरू झालेल्या पावसाने पथारी व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय करायला संधीच मिळाली नाही. सुमारे
6 वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरू होती.
“सातच्या आत घरात’ आवश्यकच
पहाटे पाचपासून शिथिलता जरी असली, तरी सातच्या आत दुकाने आणि सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश असून, त्यानंतरही ते सुरू राहिल्यास ते दंडाला पात्र ठरणार आहेत. त्यामुळे 31 जुलैपर्यंत सायंकाळी “सातच्या आत घरात’ या नियमाचे पालन करावेच लागणार आहे. त्यापुढे संचारबंदी लागू होणार असल्याने, त्या काळात अत्यावश्यक असेल तरच परवानगीने बाहेर पडता येणार आहे.
पी-1 पी-2 चे “कन्फ्युजन’
पी-1 पी-2 पद्धतीने दुकाने उघडण्याला परवानगी देण्यात आली. मात्र काही जणांना आपली दुकाने कधी उघडायची हे न समजल्याने त्यांचेही “कन्फ्युजन’ झाले. मुळात पी-1 पी-2 या पद्धतीलाच अनेक व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. हा प्रकार करण्यापेक्षा आठवड्यातील पाच दिवस दुकाने उघडण्याला परवानगी द्या, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. मात्र यावर अद्याप प्रशासनाने निर्णय घेतला नाही.