Mumbai Water Cut – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातील पाणीसाठ्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळेच 30 मेपासून 5 टक्के तर 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून ठाणे, भिवंडी निजामपूर महापालिकेला दररोज होणाऱ्या 150 दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्यातही ही पाणी कपात लागू राहणार आहे.
त्यामुळे आता मुंबईकरांना आणि ठाणे, भिवंडीकरांनाही दररोज पुरवठा होणाऱ्या पाण्याची बचत करणे आणि पाण्याचा जपून, काटकसरीने वापर करणे भाग पडणार आहे.
वास्तविक, 25 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण 1 लाख 40 हजार 202 दशलक्ष लीटर पाणीसाठा (पुढील किमान 35 दिवस पुरेल इतका) उपलब्ध आहे.
पावसाळा संपल्यानंतर मुंबईला 1 ऑक्टोबर रोजीपासून ते पुढील वर्षभरासाठी सात तलावात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते. मात्र सन 2021 आणि 2022 या दोन वर्षात 15 ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता.
मात्र सन 2023 मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे 5.64 टक्के पाणीसाठा कमी आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.