नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील पहिल्या ५ टप्प्यांत मतदान करण्यास ७६ कोटी ४१ लाख मतदार पात्र होते. त्यांच्यापैकी ५० कोटी ७२ लाख मतदारांनी हक्क बजावला.
निवडणूक आयोगाने शनिवारी पहिल्या ५ टप्प्यांतील मतदानाशी संबंधित आकडेवारी जारी केली. त्यानुसार, पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १०२ जागांसाठी मतदान झाले. पात्र १६.६४ कोटी मतदारांपैकी ११ कोटी जणांनी मतदान केले. त्या मतदानाची टक्केवारी ६६.१४ टक्के इतकी भरते.
दुसऱ्या टप्प्यात ८८ जागांसाठी मतदान करण्यास १५.८६ कोटी मतदार पात्र होते. त्यांच्यापैकी १०.५८ कोटी जणांनी मत दिले. त्यांचे प्रमाण ६६.७१ टक्के इतके नोंदले गेले. तिसऱ्या टप्प्यात ९४ जागांसाठी मतदारांचा कौल आजमावण्यात आला.
पात्र १७.२४ कोटी मतदारांपैकी ११.३२ कोटी म्हणजे ६५.६८ टक्के जणांनी त्यांचा कौल दिला. चौथ्या टप्प्यात ९६ जागा मतदानाच्या प्रक्रियेला सामोऱ्या गेल्या. त्यावेळी १७.७१ कोटी मतदारांपैकी १२.२५ कोटी (६९.१६ टक्के) मतदारांनी हक्क बजावला.
पाचव्या टप्प्यात ४९ जागांसाठी मतदान झाले. त्या टप्प्यात ८.९६ कोटी मतदारांपैकी ५.५७ कोटी जणांनी मतदान केले. त्या मतदानाची टक्केवारी ६२.२० टक्के इतकी नोंदली गेली.